अनारोग्याच्या मुळाशी अंधश्रद्धा
पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कनिष्ठ असतात, हा सतत बिंबवला जाणारा गैरसमज हे स्त्रियांच्या अनारोग्याचं मुख्य कारण आहे. याचमुळे त्या अंधश्रद्धेच्या बळी ठरतात आणि वाहकही बनतात. लहानपणापासून मुलामुलींना स्वतंत्र व्यक्ती म्हणून, लिंगनिरपेक्षतेनं वाढवायला हवं. मुलींना विकासाच्या शक्य त्या सर्व संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. त्यांच्यामध्ये आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करायला हवी.
आरोग्याची व्याख्या फक्त शरीरस्वास्थ्याशी निगडित आजार, अस्वच्छता, कुपोषण यासंदर्भात करून चालणार नाही. आरोग्य म्हणजे आजार, रोग, अपंगत्व नसणं हे खरंच पण त्याबरोबरच व्यक्तीचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य चांगलं असणंही आवश्यक आहे. जेव्हा आपण स्त्रीआरोग्याबद्दल विचार करतो तेव्हा साहजिकच तिचा आर्थिक स्तर, जात, धर्म, सामाजिक स्थान अशा घटकांचा विचार करावा लागतो.
बाई अंधश्रद्धेच्या आहारी जाते तेव्हा त्याच्या मुळाशी बहुधा आरोग्याशी संबंधित काही तरी प्रश्न असतो. देवळं, मठ, बुवाबाबांकडे जाणाऱ्या भक्तांमध्ये सुखी कुटुंब, नवऱ्याला यश, मुलाला नोकरी, लेकीचं
लग्न यांपेक्षा घरातील कुणाच्या किंवा स्वत:च्या आजारपणाने अगतिक होऊन
आलेल्या स्त्रियांची संख्या जास्त असते. आरोग्याच्या प्रश्नांवर वैद्यकीय
मदत हा उपाय असूनही बायका नवससायास, कर्मकांडांचा मार्ग का अवलंबतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बाई घरातल्या सगळय़ांची काळजी घेते, दुखलं-खुपलं बघते, घराचा
डोलारा सांभाळते. पण तिची काळजी घेणारं कुणी नसतं. आजारपण अंगावर काढून
स्वत:चा विचार न करता कुटुंबासाठी झिजणं म्हणजे आदर्श स्त्री, हेच त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं असतं. बायकांनीच नेहमी त्याग करायचा, हे पिढय़ान् पिढय़ा ठसवलेलं असतं. त्यामुळे करपलेली भाकरी आपल्या नाहीतर मुलीच्या ताटात घालायची आणि उरलंसुरलं, शिळंपाकं आपण जेवायचं. त्यातच धन्यता मानायची. स्वत:च्या शरीराची, आहाराची
काळजी घेणं हा त्यांना गुन्हा वाटतो. त्यांचा आहार थोडा आणि निकृष्ट असतो
आणि त्याचा परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावा लागतो. अन्नातून घेतल्या
जाणा-या कॅलरीज आणि वापरली जाणारी शरीरशक्ती यांसंबंधीच्या
एका अभ्यासात असं आढळलं आहे की रोजच्या कामामध्ये स्त्रिया आपली 53 टक्के
शक्ती वापरतात तर पुरुष 31 टक्के. स्त्रिया गरजेपेक्षा 100 कॅलरीज कमी
घेतात तर पुरुष 800 कॅलरीज जास्त घेतात. ग्रामीण भागातील 90 टक्के बायकांना
अॅनिमिया असतो. याचं कारण स्त्री-पुरुष भेदभाव. गरीबीमुळे चांगलं आणि
पुरेसं अन्न नसतं. त्यातही बाई म्हणून कमी आहार मिळतो. स्त्री-पुरुषांच्या
कामाची लिंगभेदावर आधारित विभागणी पाहता बायकांवरचा कामाचा ताण आणि आहार
याचा ताळमेळच बसत नाही.