Pages

Wednesday, May 18, 2011

महिलांच्या ताब्यात .......

महिलांच्या ताब्यात एकतृतीयांश संसद
सकाळ न्यूज नेटवर्क Wednesday, May 18, 2011 AT 12:30 AM (IST)

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात मायावती आणि दिल्लीत शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना ममता बॅनर्जी व जयललिता यांच्या शपथविधीनंतर देशात एकाच वेळी चार महिला मुख्यमंत्री असण्याचा नवीन विक्रम झाला आहे. लोकसभेच्या तब्बल 168 जागा या राज्यात येतात त्यामुळे एकतृतीयांश संसद या चार महिलांच्या ताब्यात गेली आहे.
उत्तर प्रदेशात 80, पश्‍चिम बंगालमध्ये 42, तमिळनाडूत 39, तर दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात आतापर्यंत 13 महिला मुख्यमंत्री झाल्या होत्या. यात ममता बॅनर्जी चौदाव्या मुख्यमंत्री असतील. बंगालमध्ये डाव्यांची 34 वर्षांची एकाधिकारशाही त्यांनी संपविली. स्पेक्‍ट्रम गैरव्यवहारात अडकलेल्या तरीही जनतेमध्ये भ्रष्टाचार हा मुद्दाच नसल्याचा दावा करणाऱ्या द्रमुकची तमिळनाडूतील सद्दी जयललिता यांनी संपुष्टात आणली.
प्रतिगामी मानसिकता व जातीवादामुळे टीका उत्तर प्रदेशवर केली जाते. मात्र कॉंग्रेस नेत्या सुचेता कृपलानी यांच्या रूपाने देशातील पहिली महिला मुख्यमंत्री याच राज्याने दिली. 1963 ते 1967 या कालावधीत त्या मुख्यमंत्री होत्या. ओरिसामध्येही नंदिनी सत्पथी (1972-74 आणि 1974-76) यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले. गोव्यात 1973 मध्ये दयानंद बांदोडकर यांच्या निधनानंतर त्यांची कन्या शशिकला काकोडकर यांनी दुसऱ्या मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळली. 1979 पर्यंत त्या मुख्यमंत्रिपदी राहिल्या. आसाममध्ये कॉंग्रेसच्या नेत्या सय्यदा अन्वर तैमूर 1980-81 या कालावधीत मुख्यमंत्री होत्या. तमिळनाडूत जे. जयललितांच्या आधी त्यांचे राजकीय गुरू आणि अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन एक महिन्याहून कमी काळासाठी (7 ते 30 जानेवारी 1988) मुख्यमंत्री होत्या. जून 1991 मध्ये जयललिता पहिल्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. त्यांना मार्च 2002 ते मे 2006 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली.
सर्वाधिक म्हणजेच चारवेळा मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतींना मिळाला आहे, तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम मात्र दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा आहे.पंजाबमध्येही कॉंग्रेसच्या राजिंदर कौर भट्टल 1996-97 मध्ये वर्षभरासाठी मुख्यमंत्री राहिल्या.
बिहारमध्ये 1997 मध्ये पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात जावे लागल्यामुळे त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांच्या रूपाने बिहारला पहिली महिला मुख्यमंत्री मिळाली.
महिलांना मुख्यमंत्रिपद देण्यात दिल्लीही अपवाद नाही. भाजप नेत्या सुषमा स्वराज 13 ऑक्‍टोबर ते 3 डिसेंबर 1998 या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांच्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी शीला दीक्षित (1998-2003, 2003 ते 2008 आणि 2008 पासून ते आजपर्यंत) आहेत. मध्य प्रदेशमध्येही भाजप नेत्या उमा भारतींच्या माध्यमातून महिलेस मुख्यमंत्रिपद मिळाले. त्या डिसेंबर 2003 ते ऑगस्ट 2004 या कालावधीत मुख्यमंत्री होत्या. सती प्रथेमुळे बदनाम राजस्थानातही 2003 ते 2008 मध्ये वसुंधराराजे यांच्या रूपाने महिला मुख्यमंत्री झाली.
पुरोगामी राज्ये पिछाडीवर
बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या "बिमारू' राज्यांबरोबरच ओरिसा, आसाम, गोवा या राज्यांनी महिलांना सर्वोच्चपदी बसविले. मात्र, पुरोगामी म्हणून टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये महिलांना अशी संधी कधी मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ईशान्येकडील राज्ये, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड याही राज्यांचा त्यात समावेश आहे.