Pages

Saturday, October 8, 2011

भारतीय सैन्यातील पहिली रणरागिणी
सैन्यदल मुख्य करुन पुरुषांचे क्षेत्र मानले जाते. पण, याला छेद दिला आहे तो दोन मुलांची आई असलेल्या शांती टिग्गा यांनी.महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असताना लढाईच्या मैदानाचा मात्र त्याला अपवाद होता. मात्र, महिलासुद्धा या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहू शकतात, हे भारतीय सैन्यात दाखल झालेल्या या पहिल्या महिलेने दाखवून दिले आहे. सैन्यात भरती होण्यासाठी घेण्यात आलेल्या शारीरिक क्षमता चाचणीत पुरुष सहकार्यांपेक्षा अधिक सक्षम कामगिरी करत ३५ वर्षीय सप्पर शांती टिग्गा प्रादेशिक सेनेच्या (टेरिटोरियल ९६९ रेल्वे अभियंता रेजिमेंटमध्ये दाखल झाल्या. दीड किलोमीटरचे अंतर धावताना टिग्गा यांना पुरुष उमेदवारांपेक्षा पाच सेकंद कमीच लागले. शिवाय, ५० मीटर धाव त्यांनी केवळ १२ सेकंदांत पूर्ण केली. शारीरिक चाचणीतील त्यांची ही कामगिरी उत्कृष्ट असल्याने त्यांना सैन्यात जवान म्हणून प्रवेश देण्यात आला.
महिलांना लढाऊ नसलेल्या अधिकारी श्रेणीतच सैन्य दलामध्ये दाखल होता येते. पण, शांती टिग्गा यांनी १३ लाख सैनिकांच्या दलामध्ये पहिली महिला जवान म्हणून प्रवेश मिळविला आहे.
पतीचा मृत्यू झाल्यानंतर २००५ मध्ये अनुकंपा तत्त्वावर शांती टिग्गा यांनी पश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यातील चालसा स्थानकामध्ये पॉइंट्समन म्हणून काम केले होते. गेल्या वर्षी त्यांना रेल्वेच्या प्रादेशिक सेनेसाठी स्वयंसेवक हवे असल्याची माहिती मिळाली आणि तिथे त्या दाखल झाल्या. तोपर्यंत त्यांना कल्पनादेखील नव्हती की, यापूर्वी कोणत्याच महिलेने भारतीय सैन्यात अधिकारी पदाखालील पदावर काम केलेले नाही. भरती प्रशिक्षण शिबिरादरम्यान सहजतेने बंदूक हाताळण्याच्या आपल्या कौशल्याने टिग्गा यांनी प्रशिक्षकांची वाहवा मिळविली. शिबिरादरम्यानच्या एकूण कामगिरीवरुन टिग्गा यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशस्ती देण्यात आली. शांती टिग्गा यांना प्रादेशिक सेनेत ‘सॅपर’ म्हणून सामील करुन घेण्यात आले आणि त्यांनी रेल्वे अभियांत्रिकी तुकडीबरोबर काम सुरू केले. युद्धमोहिमांदरम्यान अभियांत्रिकी कामे करणार्या तुकडीतील जवानांना सॅपर असे म्हणतात. युद्धासाठी आवश्यक पूल बांधणे, भुसुरूंग पेरणे किंवा नष्ट करणे, रस्ते-हवाई तळ उभारणी अशी त्यांची प्रमुख कामे असतात. मात्र, प्रत्यक्ष लढाईतही त्यांचा सहभाग असतो.
शांती यांना लहानपणापासून सैन्यात जाण्याची आवड. जवानांचा लष्करी हिरवा गणवेश आपण परिधान करावा असे त्यांना वाटायचे. काही नातेवाईक लष्करात असल्याने ही आवड अधिकच वाढली. यामुळे शारीरिक चाचणीत मागे पडू नये यासाठी शांती यांनी खूप सराव केला आणि भरपूर मेहनत घेतली. त्यांची मेहनत फळास आली आणि त्या भारतातील पहिल्या रणरागिणी ठरल्या आहेत. तसे पाहिले तर भारताला राणी चेन्नमा, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, झलकारी या महिला योध्दांचा इतिहास आहे. या महिलांचे कर्तृत्व संपूर्ण जगाला माहीत आहे.
भारतीय सेनादलात महिलांना प्रथम वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आला. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून सेनादलात १९६८ साली दाखल झालेल्या पुनीता अरोरा या लेफ्टनंट जनरल आणि नौदलाच्या व्हाइस ऍडमिरल या मानाच्या पदापर्यंत पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. भारतीय वायुदलातही महिला वैमानिक दाखल झाल्या खर्या; पण असे असले तरी महिलांचा समावेश हा अधिकारी पदापर्यंतच मर्यादित राहिला होता. थेट रणांगणावर महिलांची नियुक्ती भारतात आजवर झाली नव्हती. जगात केवळ इस्त्रायल, कॅनडा आणि न्यूझीलंड या तीन देशांतच महिलांची सेनादलात थेट रणांगणावर नियुक्त करण्यात येते. आता मात्र भारतीय सैन्यात थेट रणांगणापर्यंत प्रवेश मिळविण्यात शांती टिग्गा यशस्वी झाल्या आहेत. यामुळे शांती टिग्गा यांनी एक प्रकारे रणांगणावरील पुरुषी मक्तेदारीला आव्हानच दिले आहे, असे म्हणता येईल.
- धर्मेंद्र सामुद्रे

स्त्री हक्कांच्या संघर्षासाठी

 शांततेचा नोबेल

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image
महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणा-या एलेना जॉन्सन सरलीफ,लेमा बोवी आणि तवक्कुल कर्मण या तिघींना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

ओस्लो- महिलांच्या हक्कांसाठी अवरित कार्य करणा-या एलेना जॉन्सन सरलीफ,लेमा बोवी व तवक्कुल कर्मण या तीन महिलांना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून  जाहीर झाला.
"जोपर्यंत स्त्रियांना  पुरुषांप्रमाणेच हक्क व संधी मिळत नाहीत, तोपर्यंत या समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही" असे पुरस्कार समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे.
महिलांच्या हक्क आणि सुरक्षिततेसाठी अहिंसक चळवळीने लढा उभारुन शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल या तिघींचा गौरव केल्याचे शांतता नोबेल पुरस्कार देणा-या समितीने सांगितले.
एलेना सरलीफ या लायबेरीयाच्या राष्ट्रपती आहेत, लेमा बोवी याही लायबेरीयाच्याच नागरिक असून शांतता प्रस्थापनेसाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. पुरस्कारातील तिस-या भागीदार तवक्कुल कर्मण या येमेनच्या नागरिक आहेत.
सरलीफ (72) यांनी हॉर्वर्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले आहे. आफ्रिका खंडातील त्या  पहिल्या महिला लोकनियुक्त राष्ट्रपती असून 2005 मध्ये त्यांची निवड करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लायबेरीयात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्वपूर्ण काम केले.सरलीफ यांना पुलित्झर पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
लेमॅह बोवी यांनी लायबेरिया मधील  ख्रिश्चन आणि मुस्लीम महिलांना एकत्र आणून त्यांना आपल्या हक्कांविषयी जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या तिस-या महिला तवाक्कूल करमान या पेशाने पत्रकार आहेत. येमेन मधील विखुरलेल्या महिला पत्रकारांच्या संघटीत करून त्यांना मानवी हक्क मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  करमान या राजकारणातही सक्रीय असून त्यांनी येमनचे अध्यक्ष अब्दुल्ला सलेह यांना पदच्युत करण्यासाठी झालेल्या संघर्षामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.