Pages

Thursday, September 6, 2012


ती विश्वमाता

भ्रूणहत्या ही वंशाचा दिवा म्हणजे मुलगा, या गैरसमजुतीतून केली जात आहे. त्यामुळे मुलींची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मुलीला परक्याचं धन म्हणून डिवचणारे लोक अजूनही समाजात आहेत. त्या अजाण लोकांना कोणीतरी जाऊन समजवावं की, अशा कितीतरी मुली आहेत, ज्या काबाडकष्ट करून आपल्या आई-वडिलांना सांभळत आहेत. मुली पुढे जाऊन आई होतात. मोठय़ा कष्टांनी मुलांना वाढवतात. स्त्रीच्या रूपांवर प्रकाशझोत टाकण्याचा केलेला हा प्रयत्न.
ते शब्द मल्याळम् भाषेतील. पण मराठीतील असावेत इतके परिचयाचे होते. एका तरुण विधवा मातेच्या रडण्यातून ऐकू येणारे केरळमधील उद्गार आमच्या कोकणातील रत्नागिरीच्या सिंधुताईच्या तोंडून पन्नास वर्षापूर्वी मराठीतून ऐकले होते.‘‘माझ्या दोन मुलांसाठी मला कामाची गरज आहे. मला काहीतरी स्वयंपाकपाण्याचे काम आणि दिवसभर पडेल ते काम मिळवून द्या हो.’’
सिंधुताई महिला मंडळाच्या अध्यक्षबाईंना अर्धशतकापूर्वी रडत रडत विनवत होती. नऊवारी, लुगडे, घट्टा अंबाडा आणि हातात साध्या काचेच्या बांगड्या, अशा वेषातील तिची मूर्ती अजून नजरेसमोर येते. आज दक्षिणेकडील संपूर्ण साक्षर अशा केरळ राज्यात चर्चच्या पुढील प्रांगणात फिलोमिना ही तरुण, रोमन कॅथलिक आई प्रिस्टकडे रडत, हुंदके देत मल्याळम् भाषेतून विनवत होती.
‘‘फादर मला टायपिंग येतं. मी ते तर करीनच. पण ऑफिसचे इतर पडेल ते कामही करीन. मला माझ्या दोन मुलांसाठी नोकरीची फार गरज आहे. मी संध्याकाळच्या कॉम्प्युटर क्लासला जाऊन ते कौशल्यही शिकून घेईन.’’
फिलोमिना पांढ-या रंगाची, बारीक काळी नक्षी असलेली साडी नेसून उभी होती. वैधव्य आल्यानंतर पहिल्या श्राद्धापर्यंत या राज्यातील रोमन कॅथलिक स्त्रियांचा तो पोषाख असतो. सिंधुताई हिंदू तर फिलोमिना ख्रिश्चन. एक मराठी तर दुसरी तिच्यापासून हजारो मैल दूरची केरळी. दोघींच्या वयात अर्धशतकाचं अंतर. पण दोघीत एक मोठं साम्य.
आपल्या अजाण बाळांना सुरक्षित, सुखाचं भविष्य देण्याची दोघींची धडपड. एका मातेची माया आपल्याला अवगत असणा-या कौशल्यांचा वापर करून दिनरात मेहनत करण्याची आणि नवीन कौशल्य शिकून आपल्या बाळांसाठी अधिक कमाई करण्याची दोघींची तयारी. पन्नास वर्षापूर्वी सिंधुताई शिवणकाम शिकली आणि रात्रीच्या वेळी कपडे शिवून आपल्या मुलांच्या बारीक-सारीक गरजा भागवण्यासाठी चार पैसे मिळवत राहिली. आज फिलोमिना टायपिस्टची नोकरी करता करता कॉम्प्युटर शिकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
 सिंधुताईची मुलं गुणी निघाली. मुलगा सरकारी नोकरीत स्थिरावला आणि मुलगी शिक्षिका बनली. गेली तीस र्वष मी सिंधुताईला एक सुखवस्तू, मध्यमवर्गीय, सुसंस्कृत स्त्रीच्या भूमिकेत पाहत आले आहे. पण तिची मुलं लहान असताना त्यांचा एखादा बालहट्ट पुरवता न आल्यामुळे तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील! शाळेतील इतर मुलांचे कपडे, त्यांची खेळणी, त्यांच्या डब्यातील चविष्ट खाऊ पाहून त्या मुलांनी सिंधुताईकडे नक्की हट्ट धरला असेल. त्यांचा हट्ट पुरवता न आल्याने त्या आईच्या डोळ्यांतून कितीदा अश्रू वाहिले असतील! कधीतरी त्या बाळांना चापटी मारावी लागली असेल आणि मग त्या शिक्षेनं तिचं स्वत:चंच मन तिला छळू लागले असेल! आई आणि मुलं यांचं नातं असं वेगळं असतं.
 करूनि माता अनुराग-राग।
विकासवी बाळ मनोविभाग।।
फळे तरू सेवुनि उष्ण शीत।
जगी असे हिची विकासरीत।।
साने गुरुजींच्या या अर्थपूर्ण काव्यपंक्तीतून हे माता-बाळाचं नातं स्पष्ट होतं. पन्नास वर्षापूर्वीच्या सिंधुताईच्या भूमिकेत आज ही फिलोमिना उभी आहे. पण काळ खूप बदलला आहे. देशात आर्थिक उदारीकरण वैश्विकीकरण यांचे वारे वाहत आहेत. ठिकठिकाणी मॉल्स, मल्टिप्लेक्स उभे आहेत. मुलांचे कपडे, खेळणी, खाऊ यांमध्ये जागतिक स्वरूपाची विविधता आली आहे. साहजिकच मुलांचे हट्ट पुरविताना सुखवस्तू पालकांनाही जड जाऊ लागले आहे. अशा परिस्थितीत फिलोमिना तिच्या तुटपुंज्या मिळकतीत आपल्या दोन बाळांना कशी वाढवू शकेल, कोण जाणे!
मुलांच्या जीवनात पन्नास वर्षात फार मोठे बदल झाले आहेत. वयाच्या तिस-या वर्षापासून स्पर्धेच्या चक्रात ती सापडली आहेत. या जीवघेण्या स्पर्धामुळे त्यांचे बाल्य जणू अवेळी संपुष्टात येत आहे. त्यातूनच बाल आणि कुमार वयातील मुलं-मुली ‘टेन्शन’ अनुभवत आहेत. शाळकरी मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्या कानावर पडत आहेत.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रसारामुळे घरोघरी विविध प्रकारच्या बातम्या आणि माहिती यांचा जणू पूरच आला आहे. त्यातूनच गुन्हेगारीकडे शाळकरी मुले आकृष्ट होताना दिसत आहेत. एक अल्प आर्थिक कुवत असणारी ही तरुण आई या सर्व संकटांचा एकटीने मुकाबला करू शकेल का? सिंधुताईपेक्षा फिलोमिनाची वाटचाल नक्कीच अधिक खडतर आहे.
सहा वाजले आणि चर्चची घंटा वाजू लागली. प्रार्थनेसाठी भाविक येत होते. चर्चवरील भिंतीवर मदर मेरी आपल्या कुशीत येशूबाळाला घेऊन येणा-या भाविकांना आशीर्वाद देत होती. ती विश्वमाता फिलोमिनाच्या मागेही असू दे. तिच्या आयुष्याची वाटचाल निर्विघ्न होवो.


मी आदिवासी बोलतेय!


आदिवासींवर होणा-या अन्यायाच्या घटना नव्या नाहीत. त्यांना नक्षलवादी ठरवून त्यांच्या हत्या केल्याच्या घटनाही घडत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून 65 वर्ष झाली असली तरी आदिवासींवर अन्याय होतातच का, याची व्यथा मांडणारं एका आदिवासी कन्येचं हे स्वगत..
आज मी बोलणार आहे. इतकी र्वष मनाला बोचणा-या यातना सहन करून जगणारी मी. ढोरांसारखी मेहनत करून उपाशी मरणारी मी. जंगलाची राणी असूनही बेघर अशी मी. आज मी बोलणार आहे. माझ्या सहनशक्तीचे बंध आता फुटलेत. मूग गिळून बसणं आता केवळ अशक्यच ! गेल्या आठवडय़ात सर्व भारतवासीयांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. झेंडावंदन, मिरवणूक, पताका.. सारं काही अगदी उत्साहात! पण मी तुम्हाला विचारते, आपण खरंच स्वतंत्र झालोत की, स्वातंत्र्याचा फक्त टेंभा मिरवतोय? ते इंग्रज होते ज्यांनी आपल्या देशावर राज्य केले आणि ते क्रांतिकारी ज्यांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केलं. पण आजचं काय? खरंच गुलामगिरी संपली? खरंच स्वातंत्र्य आलं? अन् आलं तरी कसलं स्वातंत्र्य?

देशात बांगलादेशीयांना आश्रय देऊन मूळ निवासी असलेल्या आमच्या जातबांधवांना त्यांच्या जागेवरून हुसकावून लावण्याचं स्वातंत्र्य? नक्षलवादी सांगून छाताडावर गोळ्या घालण्याचं स्वातंत्र्य. आमच्या जमिनी हिसकावताना आया-बहिणींची अब्रू लुटण्याचं स्वातंत्र्य.. की, आम्हाला मिळणा-या सवलतींच्या जोरावर गाडय़ा फिरवण्याचं स्वातंत्र्य? नेमकं कसलं स्वातंत्र्य? एकेकाळी जंगलाची राणी मानली जाणारी मी, आज लाचार कुणामुळे झालेय? कोण जबाबदार याला? भ्रष्टाचारी नोकरशाही, जी फक्त आकडे मोजून गरिबी कमी झाल्याच्या फुशारक्या मारते की, आमच्या सवलतीवर स्वत:चे खिसे गरम करणारे की, आमच्या जमिनीवर रक्ताचे पाट वाहून राजमहाल बांधणारे दलाल. आमच्या समस्यांचं भांडवल करून स्वत:ची पोळी भाजणारे राजकारणी की, आम्हाला लाचार, बिच्चारे म्हणवणारे पांढरपेशी..? कोण कोण जबाबदार आहे?

कधी कुणावर विसंबून न राहिलेली मी आज लाचार का झाले? आमच्या जमिनींवर, सवलतींवर डोळा ठेवणारे का फोफावलेत? आम्हाला जमीनदोस्त करून आमचं अस्तित्व मिटवू पाहणा-यांची वृत्ती का अधिकाधिक सोकावत चाललीय? देशाची सर्वात पहिली वासी मी. आज माझंच अस्तित्व धोक्यात आलंय नि असे करणारे कोण? माझेच देशबंधू ! मग मी स्वतंत्र कशी? एकीकडे लखलखत्या दुनियेत प्रगतीचे आकडे भराभर वाढत असताना महासत्ता बनण्याची स्वप्नं घडणा-या देशात आम्हाला पिण्याचं पाणी नशिबात नाही, मग कसली प्रगती.? राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा म्हणवणा-या या देशात जंगलच्या राणीची अशी केविलवाणी अवस्था असेल तर अशा स्वातंत्र्यापेक्षा इंग्रज बरे, असं म्हटल्यास नवल ते काय !!

तर दुसरीकडे आमच्या जमिनी घशात घालण्यासाठी आमच्या जात बांधवांची खुलेआम कत्तल केली जातेय. त्यांना नक्षलवादी ठरवलं जातंय. रोजच्या रोज नक्षलवाद्यांना मारल्याच्या बातम्या मोठय़ा अभिमानाने सांगितल्या जातायत. मग नक्षलवाद संपत का नाही? कारण मारले जाणारे माझे जात बांधव आहेत, नक्षलवादी नाही .. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणा-या समाजाचे रक्षक म्हणवणा-याचं हे अघोरी कृत्य! रक्षक हेच आमचे भक्षक बनल्यास स्वरक्षणासाठी आम्ही बंदुका का उचलू नयेत? जिथे आम्हाला पिण्याचं पाणी नाही तिथले सरकार मोफत मोबाइल वाटप जाहीर करते. वा खरंच किती मोठी प्रगती आहे ही! जर असंच आमचं शोषण होत राहिले तर आमचं अस्तित्वच नष्ट होईल. आमच्यावर अन्याय करणाऱ्या लांडग्याची आग शमेल.. थांबवा हा अन्याय! अन्यथा आम्ही पेटून ऊठू आणि आमच्यावर अन्याय करणाऱ्यांना भस्म करू! आमच्या सहनशक्तीचा अंत आता संपलाय.. तेव्हा क्रांती झाली होती इंग्रजांविरुद्ध! आता ही एक क्रांती घडेल आमच्यावर अन्याय करणा-याविरुद्ध!

अबला नाही सबला

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image 
स्त्रियांवर अत्याचार नाही, असा एकही देश नाही. हल्ली महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्येही कमालीची वाढ होत आहे. याला कारणीभूत जितका आपला समाज आहे, तितक्याच महिलाही आहेत. त्यांनी स्वत:च स्वत:चं संरक्षणाचं तंत्र निर्माण केलं पाहिजे.


विनयभंगाच्या घटनांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्याने खळबळ माजवलेली आहे. आशिया खंडातील परिस्थिती तर बिकटच म्हणावी अशी आहे. भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान हे परंपरावादी देश आहेत. इथे पुरुषप्रधान संस्कृती नांदत आहे. पण इथे फक्त रस्त्यावरच महिलांची छेडछाड केली जाते, असं नाही तर परिचित-अपरिचित महिलांच्या नावाने रेल्वे डब्यांच्या भिंतीवर, सार्वजनिक शौचालयांच्या भिंतीवर गलिच्छ, अश्लील शब्दांत शेरेबाजी लिहिली जाते. भारतात रोडरोमिओ किंवा छेडछाड करणा-यांच्या विरोधात पोलिस कारवाई करतात; पण त्यामुळे असे गैरप्रकार कमी झाले आहेत अथवा बंद झाले आहेत, असं चित्र दिसत नाही. तर अधूनमधून वर्तमानपत्रांतून अशा प्रकारच्या बातम्या वाचण्यात येतात. पीडित महिलेला वाळीत टाकणं, सार्वजनिक ठिकाणी तिचे कपडे उतरवणं इत्यादी प्रकारच्या घटना घडत आहेत.
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात स्त्रियांच्या चळवळीने स्त्रियांविषयीच्या वातावरणात पुष्कळसा बदल केला आहे. तरीही स्त्री अत्याचाराच्या घटना घडत आहेत. देशातील प्रगत राज्यांपैकी एक अशी महाराष्ट्राची ओळख आहे. पण प्रगतीच्या वाटेवर असणा-या या राज्यात महिला आणि तरुणींना पुरेशी सामाजिक सुरक्षितता आहे का? तर नाही! कारण महाराष्ट्रात दिवसागणिक छेडछाडीच्या व विनयभंगाच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होत आहे. मध्यंतरी आसाममध्ये गुवाहटीत भर रस्त्यावर मवाल्यांच्या टोळक्याने एका तरुणीची छेड काढल्याचा प्रकार एका व्हिडिओमुळे प्रकाशात आला. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. पण त्याचवेळी महाराष्ट्रातही विनयभंगाच्या घटना मोठय़ा प्रमाणावर घडत होत्या आणि त्याविषयी फारसा गदारोळ उठत नव्हता.