परिवर्तनावर विश्वास असलेली ‘लक्ष्मी
किरण मोघे | Jul 25, 2012, 02:42AM IST
23 जुलै रोजी सकाळीच दूरचित्रवाणीवर कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या दु:खद निधनाची बातमी बघताना मन खिन्न झाले. जनवादी महिला संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची एक कार्यकर्ती या नात्याने त्यांच्या सहवासात घालवलेल्या अनेक क्षणांच्या आठवणी उजळून आल्या.
हस्तांदोलनाच्या त्यांच्या कोमल स्पर्शातून, प्रेमळ आवाजातून त्या आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना आपलेसे करून घेत; पण कोणत्याही प्रकारच्या अन्याय-अत्याचाराला मात्र अतिशय कणखरपणे प्रखर विरोध करत असत. 2010मध्ये कानपूर येथे संघटनेचे 10वे राष्ट्रीय अधिवेशन झाले तेव्हा आपल्या उद्घाटनाच्या संदेशात सर्व प्रतिनिधींना ‘रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अन्यायाविरुद्ध लढत राहा’, असे आवाहन त्यांनी केले, तेव्हा सभागृहात प्रचंड स्फूर्तिदायक आणि रोमांचकारी झालेले वातावरण अजूनही मला आठवते.
कॅप्टन लक्ष्मी यांचा जन्म मद्रास (चेन्नई) येथे 24 ऑक्टोबर 1914 रोजी झाला. त्यांचे वडील एस. स्वामीनाथन हे मद्रास उच्च न्यायालयाचे प्रख्यात वकील होते, तर त्यांची आई अम्मूकुट्टी या महिलांच्या हक्कांसाठी लढणा-या समाजसेविका आणि स्वातंत्र्यसेनानी होत्या. अशा आर्थिक-सामाजिकदृष्ट्या संपन्न कुटुंबात स्वातंत्र्य आंदोलनाचे बाळकडू त्यांना मिळाले. तरुण वयातच लक्ष्मी स्वामीनाथनने उत्साहाने ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधी राष्ट्र ीय चळवळीत उडी घेतली. परकीय वस्तूंची होळी करताना स्वत:चे महाग कपडे व खेळणी जाळताना त्यांना अजिबात वाईट वाटले नाही.