Pages

Saturday, February 4, 2012

विधानसभा 
निवडणुकीत महिला उपेक्षितच! 
 न.मा. जोशी
http://lok.financialexpress.in/index.php?option=com_content&view=article&id=14366:2009-10-08-14-35-32&catid=229:2009-08-31-13-49-53&Itemid=228
यवतमाळ, ८  ऑक्टोबर
संसद आणि राज्य विधिमंडळात
महिलांसाठी ३३ टक्के जागा ‘राखीव’ असाव्यात, त्यासाठी घटना दुरुस्ती करावी, अशी मागणी करणारे राजकीय पक्ष प्रत्यक्षात महिलांना एक तर उमेदवारीच देत नाहीत आणि जर काही महिला उभ्या असल्या तर त्यांना निवडून देण्याचे आवाहनही करीत नाही ही बाब आतापर्यंतच्या बारा विधानसभा निवडणुकांमधून स्पष्ट झाली आहे.
महिला मतदारसुद्धा महिला उमेदवारांना मतदान करीत नाहीत, त्यामुळे महिलांचीही एकजूट नाही, हेही यामुळे स्पष्ट झाले आहे. १९६२ पासून तर २००४ पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे विदर्भातील चित्र पाहिले तर महिला आमदारांची संख्या दोनअंकीसुद्धा नाही, हे कटू वास्तव समोर येते.
 १९६२ साली विदर्भातून फक्त इंदिरा कोरमरकर (बुलढाणा-काँग्रेस), शांता पागे (मंगरूळपीर-काँग्रेस), कुसुम कोरपे (मूर्तीजापूर-काँग्रेस) आणि सुशीला बलराज (नागपूर-२, काँग्रेस) या चौघीजणी आमदार होत्या. १९६७ साली फक्त सुशीला बलराज (नागपूर) या एकमेव महिला आमदार होत्या. १९७२ साली प्रतिभा तिडके (मूर्तीजापूर), कोकिळा पाटील (दर्यापूर), प्रभा राव (पुलगाव) व सुशीला बलराज (नागपूर) या चौघी काँग्रेस आमदार होत्या. १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभा राव (पुलगाव) आणि राजकुमारी बाजपेयी (गोंदिया) या दोघीच आमदार होत्या व दोघीही काँग्रेसच्या होत्या. १९८० सालच्या निवडणुकीत श्रद्धा टापरे (जळंब), कोकिळा गावंडे (मोर्शी), राजकुमारी बाजपेयी (गोंदिया) व यशोधरा बजाज (चिमूर) या चौघी काँग्रेसच्या आमदार होत्या. १९८० च्या निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या आबासाहेब पारवेकरांचे देहावसान झाल्याने पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत जांबुवंतराव धोटेंच्या पत्नी विजया धोटे (काँग्रेस) निवडून आल्या होत्या.
१९८५ मध्ये श्रद्धा टापरे, प्रभा राव आणि राजकुमारी बाजपेयी या तिघी पुन्हा निवडून आल्या शिवाय दमयंती देशभ्रतार (नागपूर) यांची भर पडली. संख्या पुन्हा ‘आम्ही चार चौघी’ अशीच राहिली. या सर्व काँग्रेसच्याच होत्या. १९९० मध्ये विदर्भातून फक्त दोनच महिला आमदार झाल्या आणि पहिल्यांदा काँग्रेसेतर महिला विधिमंडळात पोहोचल्या त्या म्हणजे पुलगावमधून सरोज काशीकर या जनता दलच्या उमेदवारीवर निवडून आल्या. त्यांनी काँग्रेसच्या प्रभा राव यांचा फक्त ८९३ मतांनी पराभव केला होता.दुसऱ्या आमदार होत्या भाजपच्या शोभा फडणवीस (सावली मतदारसंघ) त्यांनी काँग्रेसच्या वामनराव गड्डमवार या मंत्र्यांचा जवळपास साडेपाच हजार मतांनी पराभव केला. पुढे शोभाताईसुद्धा सेना-भाजप मंत्रिमंडळात मंत्री झाल्या होत्या.
१९९५ साली फक्त तीन महिला आमदार विदर्भातून विधानसभेत गेल्या. त्यात चिखलीतून रेखा खेडेकर आणि सावलीतून शोभा फडणवीस या दोघी भाजपच्या तर प्रभा राव पुलगावमधून काँग्रेस आमदार म्हणून निवडून गेल्या. १९९९ मध्ये रेखा खेडेकर पुन्हा चिखलीतून निवडून आल्या. शोभा फडणवीसदेखील सावलीतून पुन्हा विजयी झाल्या. यावेळी अचलपूरमधून वसुधा देशमुख (काँग्रेस) विधानसभेत विजयी झाल्या व राज्यमंत्रीही झाल्या. मागील म्हणजे २००४ च्या निवडणुकीत रेखा खेडेकर (भाजप) चिखलीतून पुन्हा जिंकल्या, शोभा फडणवीसदेखील विजयी झाल्या. २००४ मध्ये आणखी एक महिला चर्चेत आल्या त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके (बडनेरा), त्यांनी सेनेच्या धाने पाटलांचा ५ हजार ७५९ मतांनी पराभव केला होता.
विदर्भातील गेल्या वेळच्या ६६ मतदारसंघापैकी मलकापूर, बुलढाणा, सिंदखेड राजा, मेहकर, जळंब, आकोट, बाळापूर, अकोला, बोरगाव मंजू, वाशीम, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, मोर्शी, अमरावती, वलगाव, चांदूर, आर्वी, हिंगणघाट, काटोल, सावनेर, रामटेक, तुमसर, तिरोडा, गोंदिया, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, गोरेगाव, आमगाव, साकोली, आरमोरी, राजुरा, गडचिरोली, वणी, राळेगाव, दारव्हा इत्यादी ४० मतदारसंघातून एकही महिला उमेदवार लढत नव्हती, तर उर्वरीत मंगरूळ, कारंजा, तिवसा, पुलगाव, वर्धा, कामठी, उमरेड, नागपूर, भंडारा, अडय़ाळ, केळापूर, यवतमाळ, उमरखेड, दिग्रस, भद्रावती, पुसद इत्यादी २६ मतदारसंघातून फक्त ३२ महिला उभ्या होत्या. कोणत्याही मतदारसंघात तीन पेक्षा जास्त महिला उमेदवार नव्हत्या. सुनीता गावंडे, डॉ. आरती फुफाटे, सुरेखा कुंभारे, यशोमती ठाकूर अशा काही महिला उमेदवारांनी लढत चांगली दिली पण त्यांचा पराभव झाला. १९६२ ते २००४ पर्यंतच्या निवडणुकीत विदर्भातून प्रत्येक वेळी चार पेक्षा अधिक महिलांना आमदार होण्याची संधी मिळाली नाही हे कटू वास्तव आहे. या कटू वास्तवाला बदलायचे असेल तर महिलांना ३३ टक्के आरक्षण हाच पर्याय आहे, असे म्हटल्यास चूक ठरू नये.
काश्मिरातील पंचायत निवडणुकीत 
महिला सरपंचांचे प्रमाण एक टक्कासुद्धा नाही

देश-विदेश श्रीनगर, २४ जुलै / पी.टी.आय.

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात महिलांना आरक्षणाच्या माध्यमातून संधी देण्याचे कितीही प्रयत्न सरकारतर्फे सुरू असले तरी जम्मू-काश्मीर मधील पंचायत समित्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महिला सरपंचांचे प्रमाण एक टक्कासुद्धा नाही. राज्यातील २२ जिल्ह्य़ांमधील पंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या ४ हजार ११३ सरपंचांमध्ये फक्त २८ महिला असून याची टक्केवारी अवघी .६८ एवढी आहे. जम्मू-काश्मिरच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने केलेल्या संकलनात २२ जिल्ह्य़ांपैकी ११ जिल्ह्य़ांमध्ये एकही महिला सरपंच निवडून आलेली नाही. सर्व जागी पुरुष सरपंचांचे वर्चस्व आहे. खोऱ्यातील १० जिल्ह्य़ांपैकी ८ जिल्ह्य़ांमध्ये एकही महिला सरपंच नाही. उत्तर काश्मिरातील बारामुल्ला आणि दक्षिण काश्मिरातील शोपियाँ जिल्ह्य़ात तीन महिला सरपंचपदी निवडून आल्या आहेत. परंतु, ४५३ पदांपैकी फक्त तीनच पदांवर महिलांची निवड होणे हे लिंगभेद अद्याप संपुष्टात न आल्याचेच लक्षण असल्याचे मानले जात आहे. आश्चर्य म्हणजे लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्य़ात महिलांचे राजकारणातील अस्तित्व दखल घेण्याजोगे असूनही या जिल्ह्य़ांमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीत एकही महिला विजयी होऊ शकली नाही. जम्मू विभागातील किश्तवार जिल्ह्य़ात एकाही महिलेला विजय मिळवता आलेला नाही. उर्वरित ९ जिल्ह्य़ांमध्ये महिला निवडून आल्या असल्या तरी त्यांचे अस्तित्व अत्यंत तुरळक आहे. उधमपूर आणि पूंछ या जिल्ह्य़ात प्रत्येक पाच आणि चार महिला सरपंचांची निवड झाली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी बी.आर. शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पंचायत निवडणुकीत महिला मोठय़ा संख्येने सहभागी होण्यास तयार नसल्याने प्रमाणात विसंगती निर्माण झाली असावी. तसेच अनेक पंचायत समित्यांमध्ये महिला सरपंचांसाठी आरक्षण नव्हते. शिवाय कित्येक वर्षांनंतर पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. घटनातज्ज्ञांच्या मते ७३ व्या घटनादुरुस्तीचा प्रभावी अंमल करण्यात अपयश आल्याने असे घडले असावे. महिलांसाठी आरक्षण नसल्याने पुरुषांच्या वर्चस्वाला शह देण्यात त्या अपयशी ठरल्या. विरोधी पक्षनेत्या व पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी पंचायत समित्यांची निवडणूक हा ग्रामीण भागातील महिलांसाठी नवा अनुभव असल्याचे सांगितले. पहिलीच निवडणूक असल्याने महिला मोठय़ा प्रमाणात समोर आल्या नाहीत. परंतु, पुढच्या वेळी चित्र कदाचित बदललेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.