Pages

Thursday, March 8, 2012

मातेर बाया!

आपल्या देशात कष्टकरी बायाचं काय जीवन आहे, हे मी बाजार समितीच्या मातेर बायांना पाहून जाणलं. स्त्री म्हणून आज बायांची तेही अत्यंत हलकं समजल्या जाणार्‍या कष्टकरी जीवन जगणार्‍या बायांना आज समाज कसा वागवतो हे चित्र विदारक आहे. त्याचं असं झालं वर्ध्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीतील ५० बायांना ‘मातेर बायांना’ (त्यांना तसेच म्हणतात किती भयानक शब्द आहे हा.) कामावरून काढून टाकण्यात आले, असा फोन १७ एप्रिल २०१० ला दुपारी डॉ. हरिश धुरट, नागपूर यांना आला. ते गेल्या ३० वर्षांपासून असंघटितांसाठी काम करीत आहेत. त्यांनी मला बाजार समितीच्या संचालकांची करामत सांगितली आणि मी ताबडतोब धाव घेतली आणि वस्तुस्थिती पाहिली तर असं दिसून आले की गेल्या १२ ते १५ वर्षांपासून कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये पैसा व मातेरे वेचणार्‍या या बायांना शासनाने माथाडी कामगार कायदा लागू केला तेव्हा त्यांना लेव्हीचे पैसे द्यावे असा शासनाकडून आदेश आला म्हणून त्यांचा ७०० रुपये मेहनाताना लेव्हीमुळे तो ३०० रु. वाढवून म्हणजे १००० रुपये झाला. तेव्हा या ५० बायांना हा पैसा देणे त्यांच्या जीवावर आले आणि त्यांनी बायांवर या चोरी करतात हा आरोप लावून त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले व त्या बेरोजगार झाल्या. यापेक्षा जास्त म्हणजे त्यांना पोलीस आणून बाहेर हाकलण्यात आले आणि त्यांना अत्यंत लाजिरवाणी अशी वागणूक देण्यात आली. मी याबद्दल पत्रकारांना बोलावले जेणेकरून या गरीब, निराधार असंघटीत बायांची बाजू त्यांनी लोकांसमोर मांडावी असे वाटले पण पत्रकार मात्र व्यवस्थेच्या बाजूने गेले आणि बायांवर चोरीचा आरोप देऊन, त्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची बाजू घेऊन नामानिराळे झाले.
डॉ. हरिश धुरट, बाया व आम्ही कार्यकर्त्यांनी असं ठरवले की रोज इथे येऊन  बसायचे व बैठा सत्याग्रह करायचा. मग त्यानुसार दररोज स्त्रिया यायला लागल्या. तर दोन दिवसांनी मग या लोकांनी त्या बायांना पोलीस स्त्रियांकडून खूप धक्काबुक्की करून बाहेर घालवलं. जिथे खूप ऊन आहे जिथे अजिबात सावली नाही, तिथे त्यांना फाटका बाहेर बसायला लावले. जिथे झाड आहे, सावली आहे तिथे बायांना बसू दिले नाही. अक्षरश: तिथून घालवून दिले आणि त्यांना एवढी मानवता राहिली नाही की भर दुपारच्या ऊन्हात त्या बायांना ज्या पद्धतीने तिथे वागवलं जाते ते केवळ तेव्हा अंगावर शहारे येत होते.
आता आम्ही बायांना कामाच्या ठिकाणी लैगिंक अत्याचार केला तर त्यांच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे, तसे कायदे आहेत हे सांगितले जाते पण त्या बायांकडून या देशातले कायदे, विचार सारेच दूर आहे. मी भाषण देताना त्यांना गाडगेबाबा माहित आहेत का असे विचारले तर, त्यांना कोण गाडगेबाबा? असा प्रश्न पडला. त्यांना काहीच माहित नव्हते. त्यांना फक्त सर्व लोकांकडून शिव्या त्याही अत्यंत गलिच्छ लैगिंक शिव्या त्याच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांकडून, पुरुषांकडून अत्यंत निर्लज्जपणाने सर्रास वापरल्या जातात. त्यांच्या कोणी कधी आईच्या पेक्षा मोठय़ा आहेत, वयांनी मोठय़ा आहेत म्हणून आदर केला पाहिजे असं कोणालाच वाटत नाही. एका बाईंनी जी ६५ वर्षांची होती तिला २६, २७ वर्षांचा क्लार्क अत्यंत अनादाराने तिच्या शरीराला लैगिंकतेला धरून शिवी देऊन बसला आणि ती बिचारी गप्प राहिली. हा अनुभव भयानक होता. त्या बाईने स्वत: का असे बोलणे सहन करावे? १ रुपये पोतं मजुरी मिळते व पसाभर मातेर मिळते त्या अत्यंत गरीब बायांनी ह्या चिटभर मजुरीसाठी हे सहन करावं लागते हे केवढी भयंकर बाब आहे.
या मातेरे बायांच्या जगात केवळ लैगिंक शोषणाचे राज्य आहे. एक म्हातारीबाई (६५ वर्षांवरील) मला अनुभव सांगत होती. बाई माझा नवरा चौकीदारी करीत होता. आता घरीच आहे. तो मला म्हणाला, मी परत काम मागायला जातो. पण त्याचे डोळं गेलं आहेत मी त्याला म्हटलं, ही रांड आहे ना’ तुम्ही घरात बसा चूपचाप. आणि बाई माझा नवरा माझं ऐकून घरीच राहतो. एक अपंग पोरगी आहे. घरात मीच एकटी कमावती आहे. आणि त्यात कामावरून काढलं.! मला त्या बाईचं खूप आश्चर्य वाटलं. तिची एवढी दयनिय स्थिती आणि ती स्वत:ला ‘रांड’ म्हणते. मी तिला म्हटले, बाई लोकांनी म्हटले तर वाईट आहे, असे आपण स्वत:लाच असं म्हणायचं हे काय चांगल आहे? यावर ती कसनुसं तोंड करून म्हणाली, नाईबाई, चुकलचं माझं.
म्हणजे ह्या समाजात असं झालं की ह्यांना सारं जग खराब, घाणेरडय़ा पद्धतीने वागवते तर त्याही स्वत:लाच हे समजायला लागल्या असं दिसून येत असं मला वाटते. जगाने बाईला खालचं ठरवलं आणि आपणही स्वत:ला  तेच समजावं, तेही वाईट ही केवढी भयंकर अशी बाब आहे, गुलाब बनवलं आणि आम्ही गुलामी मान्य करतो आहे.

धम्मक्रांतीनंतरच्या बौद्ध स्त्रिया

नवीन धर्माचे मूळ रुजवण्यासाठी अनेक शतकांचे प्रचार आणि प्रसार कार्य व्हावे लागते. नवीन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींबाबत लवकरात लवकर फुले व फळे पहावयास मिळतील, अशी अपेक्षा धरणे चुकीचे ठरते. डॉ. आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारून पंचावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. या धम्म स्वीकारण्यामध्ये स्त्रियांचेही प्रमाण खूप होते. या कारणाने आज बौद्ध स्त्रियांनी समाजामध्ये मोठय़ा प्रमाणात परिवर्तन घडवून आणले आहे. कारण हिंदू धर्मातील तत्त्वे ही पूर्वाश्रमींच्या दलित स्त्रियांच्या मनावर खोलवर रुजलेली होती. पण धम्माचे आचरण करणार्‍या बौद्ध स्त्रिया हिंदू धर्माच्या अंधश्रद्धा व वाईट चालिरीती यापासून बर्‍याच अंशी मुक्त झाल्या आहेत.
भारतीय संस्कृतीत भारतीय स्त्री जीवनाचा इतिहास पाहिला तर वेदकालीन स्त्रियांना पुरुषांप्रमाणे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्वातंत्र्य होते. त्याचप्रमाणे स्त्रिया समाजाकडून सुरक्षित होत्या. तिच्याकडे पाहण्याची सामाजिक दृष्टी स्वच्छ होती. परंतु नंतरच्या काळात इथल्या स्त्रीचे स्थान, तिची मानसिकता ही संस्कृतीने घटविली आणि समाजव्यवस्थेने तिला दुय्यम स्थान देऊन तिच्या मनाचा कोंडमारा केला. हिंदू धर्मातील वर्णाधिष्ठित समाजव्यवस्थेने संपूर्ण स्त्री जातीलाच ‘शूद्र’ संबोधून तिची अवहेलना केली. या सामाजिक स्थितीचा विचार केला तर ‘मानव’ म्हणनू स्त्रीचे अस्तित्व नाकारले. मानवी हक्कापासून अलिप्त असलेल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीतील स्त्रीची मानसिकता व इतर व्यवस्थेतील स्थान पाहता दुय्यम नव्हे, तर तिचे स्थानच विचारात घेतले गेले नाही. यामुळे तिचे स्थान पशूपेक्षाही गौण मानले जायचे.
गौतम बुद्धांनी तर स्त्रियांना प्रथमता निर्वाणाची संधी उपलब्ध करून देऊन स्त्रीमुक्तीचे पहिले क्रांतिकारक पाऊल उचलले. तिच्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून ‘एक मानव’ म्हणून बघितले. स्त्रियांना समानतेचा हक्क प्राप्त करून देऊन तिला सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक स्वातंत्र्य प्राप्त करून देऊन स्त्रियांच्या गुणांना संधी उपलब्ध करून दिली. तिचे स्थान उच्च आहे, असे वैचारिक वातावरण निर्माण करून समानता आणली.
एकोणिसाव्या शतकात ‘क्रांतिबा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांनी स्त्रीमुक्तीसाठी आशेचा किरण दाखविला. समानतेची वाटचाल करण्यासाठी शिक्षणाचा पाया रोवला. स्त्रियांना शिक्षणाने जागृत होऊन तिला आपण ‘मानव’ आहोत आणि आपणास जीवन घडविण्याचा व आदर्श समाज निर्माण करण्याचा हक्क आहे, याची जाणिवही झाली.

हिंदु स्त्रियांची उन्नती अवनती : जबाबदार कोण?

E-mail Print PDF
महाबोधी : मे-जून १९५१
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द राईस ऍन्ड फॉल आफ दी हिंदू वीमेन : हू वॉज रिस्पॉन्सीबल फॉर इट ?’ या शीर्षकाच्या ‘महाबोधी’ नियतकालिकाच्या मे-जून १९५१ च्या अंकात प्रकाशित झालेल्या मूळ इंग्रजी लेखाचा हा अनुवाद.
‘ईव्हज विकली’ च्या २१ जानेवारी १९५० च्या अंकात भारतीय स्त्रियांच्या अवनतीला मुख्यत: बुद्धाची शिकवण कारणीभूत असल्याचा आरोप करणारा लेख प्रसिद्ध झाला होता. या आरोपाचे खंडन करण्याच्या उद्देशाने लामा गोविंद यांनी लिहिलेला ‘स्त्रियांचे हिंदू धर्म आणि बौद्ध धम यातील स्थान’ या शीर्षकाचा इंग्रजीतील लेख ‘महाबोधी’ नियतकालिकाच्या मार्च, १९५० च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. अशा आरोपाचे खंडन करणे प्रत्येक बौद्ध धर्मियांचे कर्तव्य आहे. व ते लामा गोविंद यांनी पार पाडले. परंतु हा प्रश्न येथेच संपविता येणार नाही. बुद्धावर आरोप करण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हे. बुद्धाची महानता असलेल्या हितसंबंधी लोकांकडून असे आरोप सहसा केले जातात. त्यामुळे या प्रश्नांच्या मुळांशी जाऊन वारंवार होणार्‍या अशा आरोपाचा मूलत: शोध लावणे अगत्याचे आहे. मला खात्री आहे की हा आरोप खूप गंभीर आणि तिरस्करणीय असल्यामुळे त्यांचा आणखी शोध घेण्याचे ‘महाबोधी’चे वाचक स्वागत करतील.
बुद्धाच्या विरूद्ध होणार्‍या या आरोपला फक्त दोन ठिकाणी आधार मिळू शकतो. पहिला संभाव्य आधार ‘महापरिनिब्बाण सुत्ता’च्या प्रकरण पाचमध्ये आनंदाच्या प्रश्नाला बुद्धाने उत्तर दिले, असे जे, सांगितले जाते तो असू शकतो. तो येणेप्रमाणे,
९ ‘स्त्रियांशी वागताना आम्ही कसे वागावे?’ आनंदाने विचारले.
‘आनंदा, जणू त्यांना बघत सुद्धा नाही, असे’
‘परंतु त्यांना पहावे लागलेच तर आम्ही काय करावे?’
‘आनंदा बोलू नये’
‘परंतु त्या आमच्याशी बोलल्याच तर भगवंत, आम्ही काय करावे?’
‘आनंदा तुम्ही सर्वोपरी जागरूक असावे’
ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसने प्रकाशित केलेल्या ‘महापरिनिब्बाण सुत्ता’ च्या मूळ भागात प्रस्तुतचा भाग पाहायला मिळेल हे नाकारता येणार नाही. परंतु प्रस्तुत उतारा प्रत्यक्ष त्यात आहे किंवा नाही, हा मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की, प्रस्तुत उतार्‍याच्या आधारावर जर एखाद्या युक्तिवादाची उभारणी होत असेल तर तो संबंधित उतारा हा मूळचा तसेच खरा असून नंतरच्या काळात भिक्खूंनी तो प्रक्षिप्त केलेला नाही हे सिद्ध करण्याची गरज नाही काय?
मी सावित्री जोतिराव ः एका महासंग्रामाची कादंबरी
उत्तम कांबळे
Tuesday, January 03, 2012 AT 02:00 AM (IST)
http://online2.esakal.com/esakal/20120103/5540810215544756510.htm 
सावित्रीबाई फुले म्हणजे आधुनिक महाराष्ट्रातील एक
 महान समाजनायिका. त्यांच्यावरील महाकादंबरी नक्कीच वाचनीय आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे एका अर्थाने आपल्याकडील आद्य शिक्षिका. समाजक्षेत्र ढवळून क्रांतीचे अनेक झेंडे फडकविणाऱ्या वीरांगना. व्यवस्था नमविण्यासाठी आणि नव्या व्यवस्थेसाठी नवे विचार व जुन्या लढायांची पेरणी करणाऱ्या झुंजार महिला. स्त्रीमुक्तीचा उद्‌गार त्यांच्यापासूनच सुरू होतो. आणि व्यवस्थेने सर्वहारा ठरवलेल्या समस्त महिलांच्या समोर खऱ्या अर्थाने शिक्षण जायला सुरवात होते ते त्यांच्यापासूनच. इतिहासात समाज क्रांतिकारक किंवा समाजक्रांतीचे पिता व माता म्हणून फुले दांपत्य प्रसिद्ध आहे. अजरामर झाले आहे. गेली अनेक दशके किंवा शतके जोतीराव आणि सावित्रीबाई म्हणजे उपेक्षितांच्या लढ्यांचे प्रेरणास्रोत बनले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महागुरू बनले. सावित्रीबाईंवर त्यांच्या हजारो, लाखो लेकींनी कथा लिहिल्या. कविता लिहिल्या, चित्रे काढली. आणखी काय काय केले, सांगता येत नाही. सावित्रीबाईंचे नायगाव हे माहेर. आता महाराष्ट्रातल्या लाखो लेकीबाळींचे प्रेरणास्थान बनले आहे. इतिहासात अशा गोष्टी खूप अपवादात्मक स्वरूपात घडत असतात. समाजाच्या इतिहासाला त्या सातत्याने वळण देत असतात. सावित्रीबाईंनी पुण्यात महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली नसती तर? हा तसा सोपा प्रश्‍न आहे; पण त्याचे उत्तर खूप कठीण आहे. इतिहासात महानायिका बनून राहिलेल्या सावित्रीबाईंवर आता मराठी साहित्यात एक महाकादंबरी जन्माला आली आहे आणि सोलापूरच्या कविता मुरूमकर यांनी ती लिहिली आहे. माझ्या माहितीप्रमाणे महानायिकेवर महाकादंबरी लिहिण्याचा कदाचित हा पहिलावहिला प्रयत्न असावा.


शिकलेल्या, लढणाऱ्या प्रत्येक महिलेमागे तशी सावित्रीबाईंची एक अदृश्‍य सावली विचार होऊन, हत्यार होऊन सतत वास करीत असते. असंख्य महिलांना ती लढण्याची आणि व्यवस्थेशी दोन हात करण्याची प्रेरणा सातत्याने देत असते. कविताने सावित्रीबाईंचे चरित्र वाचले आणि ती झपाटून गेली. चरित्र लिहिण्याचा तिने संकल्प सोडला. हजारो मैल भ्रमंती केली. फुले पती-पत्नीच्या सर्व क्रांतिकारी पाऊलखुणा शोधल्या. तिथली माती आपल्या कपाळावर लावली. अनेक कागदपत्रे चाळली. ग्रंथ वाचले. शेकडो व्याख्याने ऐकली आणि ती कादंबरी लिहू लागली. क्रांतिकारी समाजपुरुषावर किंवा समाज महिलेवर कविता लिहिणे सोपे असते. पण, कादंबरी लिहिणे महाकठीण असते. काळाचा एक अभेद्य पडदा चिरत-चिरत मागे जावे लागते. वर्तमानाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तेथेच अनेक दिवस वास्तव्य करावे लागते. भिडे वाड्यात जावे लागते. नायगावात जावे लागते. सावित्रीबाईंनी सहन केलेल्या दगड-विटांचा माराही पाहावा लागतो. सगळ्या भूतकाळाची वीण उसवत-उसवत हा एक महासंग्राम पाहावा लागतो. समजून घ्यावा लागतो. इतिहासाचे गोडवे गाणे सोपे; पण त्याला हात लावणे तसे कठीण असते.


कविताने दोन-तीनशे पानांच्या मोठ्या आकाराच्या कादंबरीत सावित्रीबाईंच्या जीवनावर मोठ्या खुबीने युद्धपट साकारला आहे. त्यांच्या जीवनातील बहुतेक छोटे मोठे प्रसंग टिपले आहेत. त्यांचे सार्वजनिक जीवन जसे दिसते तसेच खासगी जीवनही दिसते. जोतीराव आणि सावित्री शरीराने दोन असले तरी विचाराने, वर्तनाने, लढायांनी एक होते. अभेद्य होते. सावित्रीबाईंच्या जीवनाचा पट उलगडत असताना स्वाभाविकच महात्मा फुल्यांचे क्रांतिदर्शन होणेही एकदम स्वाभाविक आहे. या कादंबरीतही तसे ते पाना-पानावर दिसते. सर्वसामान्य माणसांचे खासगी जीवन आणि सार्वजनिक जीवन अनेकदा वेगळे असते. काही वेळेला या दोन जीवनात अंतर पडतानाही दिसते. काही वेळेला ग्रंथातला माणूस वेगळा आणि जगण्यातला माणूस वेगळा वाटायला लागतो. अनेक महापुरुषांच्या बाबतीत मात्र असे घडत नाही. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती फुले त्यापैकी एक होते. त्यांचे अवघे जीवन, अवघा श्‍वास, अवघ्या हालचाली या समाजाशी, लढायांशी जोडल्या गेल्या आहेत. स्वयंपाकघरापासून दिवाणखान्यापर्यंत हे पती-पत्नी एकाच विषयावर चर्चा करताना दिसतात आणि तो विषय म्हणजे गड्या आपल्याला समाज बदलायचा, व्यवस्था बदलायची, माणसांचे अवमूल्यन थांबवायचे आणि त्यासाठीच जगायचे. समाजक्रांती हेच या दाम्पत्याच्या जगण्याचे प्रयोजन होते. त्यासाठीच ते जगले.
महात्मा फुले जिवंत असेपर्यंत सावित्रीबाई त्यांच्या सर्व लढ्यात सक्रिय सहभागी होत्या. त्यासाठी अनेकदा त्या स्वकियांशीही झगडा देतात. माहेरच्या माणसाशी भांडतात. तत्त्व आणि व्यवहार, समाज आणि खासगी नातीगोती असे जेव्हा-जेव्हा द्वंद्व सुरू होते, तेव्हा त्या तत्त्वाच्या, समाजाच्या, मूल्यांच्या बाजूने ठामपणे उभ्या राहताना दिसतात. फुले वाड्यातला हौद खुला करायचा असेल, नवी धर्मनीती, नवा धर्म जन्माला घालायचा असेल, इंग्रजांना निवेदने द्यायची असतील, व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे असेल, शूद्र-अतिशूद्रांसाठी शिक्षण खुले करायचे असेल, अनाथ मुलांचा, फेकून दिलेल्या मुलांचा सांभाळ करायचा असेल, घराचेच अनाथालय करायचे असेल किंवा अशा अनाथांचे आई-वडील बनायचे असेल तर प्रत्येक वेळी सावित्रीबाई आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहताना दिसतात. अशी भूमिका करताना त्या अनेकदा स्वतःची प्रज्ञा, स्वतःचा विचारही ठामपणे वापरतात. केवळ पतीभक्त आणि पतीनिष्ठा म्हणूनच त्या हे सारे करीत आल्या, असे नाही तर समाज बदलाची तीव्र आकांक्षा पतीप्रमाणे त्यांच्याही मनात सतत होती. पतीचे आदेश पालन करणारी एक पत्नी एवढीच त्यांची भूमिका नाही, तर स्वतंत्रपणे अनेक लढायांना निमंत्रण देणारी आणि त्या लढणारी वीर पत्नी, वीर महिला म्हणूनही त्यांची भूमिका होती. खरोखरच त्या स्वतःचा विचार आणि स्वतःचा कणा घेऊन जगणाऱ्या महिला होत्या, हे फुल्यांच्या निधनानंतरही सिद्ध झाले. फुल्यांच्या सर्व लढाया तर त्यांनी पुढे नेल्याच, शिवाय स्वतःच्या लढायाही त्या लढल्या. पायाला भिंगरी लावून त्या फिरल्या. अनेक आंदोलनांचे स्वतः नेतृत्व केले. रुग्णांची सेवा केली. शिक्षणाची चळवळ पुढे नेली आणि व्यवस्थेच्या मानेवर तर उभ्या राहिल्याच राहिल्या. या सर्व गोष्टी कविताने कादंबरीत अतिशय सुंदर मांडल्या आहेत. प्रबोधनासाठी किंवा सावित्रीबाईंच्या जीवनाचा धावता पट समजून घेण्यासाठी, नव्या पिढीसाठी ही कादंबरी उपयोगी ठरावी. कादंबरीतील काही मर्यादांचा विचार करूनही तिचे स्वागत करावे लागेल. जागतिकीकरणात महिलांची वस्तू होण्याच्या काळात आणि इतिहास संपणार, अशा घोषणा सुरू असल्याच्या काळात कादंबरी आली आहे. या अर्थाने कादंबरीचे स्वागत करावे लागेल. कारण ही एका महासंग्रामाची कादंबरी आहे.
(कविता मुरूमकर, मो.- 9822029318).
जगण्यातूनच जन्मलेला स्त्रीचा तत्त्वविचार


ज्ञान हे जसे मानवी संस्कृतीच्या विकासाचे मूल कारण आहे, तसे ते मानवी स्वातंत्र्याचेही. ज्ञानाच्या विस्ताराबरोबर मानवी जीवनाच्या उदयाच्या, शाश्‍वतीच्या, पोषणाच्या आणि सातत्याच्या शक्‍यताही वाढत जातात आणि जीवनाला सीमित करणाऱ्या अनेक बाधांपासून आणि बंधनांपासून मुक्तता मिळत जाते. म्हणून विद्वानांनी ज्ञान आणि मानवी स्वातंत्र्य यांचा कार्यकारणभावसंबंध मानला आहे.
हे ज्ञान स्त्री-पुरुष सर्वांनाच आवश्‍यक आहे. त्यातली विषमता अन्याय्य तर आहेच; पण मानवी प्रगतीला घातकही आहे. मध्ययुगाच्या अखेरीस जगभरातल्या समाजधुरीणांना याची जाणीव होत गेली आणि स्त्रीस्वातंत्र्याच्या विचाराला अनेक प्रकारे चालना मिळाली. परंतु स्त्रीचा जन्म पुरुषाइतकाच एक स्वतंत्र जीव म्हणून झाला आहे आणि या जीवाला स्वतःची उन्नती करून घेण्याचा पुरुषाइतकाच स्वाभाविक हक्क आहे, याचे भान मानवी संस्कृतीच्या दीर्घ वाटचालीत जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या प्रदेशांत, वेगवेगळ्या कालखंडांत लुप्तप्राय झाले होते. परिणामी स्वतंत्र तत्त्वज्ञान-परंपरा अथवा तत्त्वचिंतनात्मक ग्रंथ यांच्या आधारे स्त्रियांनी केलेल्या तत्त्वज्ञान विचाराचा मागोवा घेता येत नाही. इसवी सन पूर्व पाचवे शतक ते इसवी सनाचे अठरावे शतक इतक्‍या दीर्घ कालखंडाला तर या दृष्टीने अंधाराचाच कालखंड म्हणावे लागते.
मात्र याचा अर्थ असा नव्हे, की स्त्रियांजवळ विचारांचे सामर्थ्यच नव्हते. वैदिक काळापासून आपल्या बौद्धिक क्षमतांचे आणि स्वतंत्र प्रज्ञेचे दर्शन स्फुट स्वरूपातच, पण स्त्रियांनी घडवले आहे. वैदिक आणि औपनिषदिक वाङ्‌मयात, बौद्ध वाङ्‌मयात आणि मध्ययुगीन भक्तिपर साहित्यात स्त्रियांच्या आध्यात्मिक विचारांचा लख्ख स्फुल्लिंग अधूनमधून;पण अगदी आधुनिक काळापर्यंत दिसत आला आहे आणि जीवनाशी घट्टपणे संलग्न, किंबहुना जगण्यातूनच जन्मलेले तिचे स्वतंत्र असे तत्त्वज्ञान निर्माण झाले. ते ग्रंथबद्ध होऊन प्रकट झाले नसले तरी ते तिच्या कृती-उक्तींमधून ते व्यक्त झालेच आहे.
झुकरबर्गसोबत महिला सरपंचांचा गौरव
8 Mar 2012, 1518 hrs IST
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12186771.cms
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
भारतीय महिलांची मान अभिमानानं उंचावणारी बातमी आज ‘ महिला दिना ’ च्या दिवशीच आली आहे. राजस्थानातील टोंक जिल्ह्यातल्या सोडा गावच्या सरपंच छवी राजावत यांना जागतिक आर्थिक मंचातर्फे देण्यात येणारा ‘ यंग ग्लोबल लीडर्स ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यासोबत त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे.
जागतिक आर्थिक मंचाच्या वतीनं दरवर्षी ४० वर्षांखालील कर्तृत्त्ववान युवा नेत्यांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारविजेत्यांमधील अनेक बड्या मंडळींमध्ये, राजस्थानातल्या छोट्याशा गावच्या सरपंच छवी राजावत यांचंही नाव जाहीर झाल्यानं भारतीय महिलांचं कर्तृत्त्व पुन्हा अधोरेखित झालंय. त्यांच्यासोबतच, पंतप्रधान कार्यालयातील मीडिया विभागाचे संचालक विनय जोब, गुगलचे लॅरी पेज, आयशर समूहाचे दीपेंद्र हुडा, ज्योतिरादित्य शिंदे, सुभाषिनी चंद्रा, वंदना गोयल, आलोक, आदर्श कुमार, अश्विन नायक, संजीव रॉय यांनाही या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.


जेव्हा भारतीय सरपंच जग जिंकते
28 Mar 2011, 0027 hrs IST
SMS NEWS to 58888 for latest updates
जयपूरची छवी राजावत ठरली आकर्षण
संयुक्त राष्ट्र
येथे भरलेल्या ११ व्या इन्फो-पॉवर्टी वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये अध्यक्षांनी एका भारतीय महिला सरपंचाची ओळख करून देताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर अविश्वासाचा भाव झळकला. जीन्स परिधान केलेली ही तरुणी भारतातल्या एका खेड्याची सरपंच आहे, यावर विश्वास बसणे खरोखरच अशक्य होते.
बॉलिवूडमधील अभिनेत्री किंवा मॉडेल शोभावी अशी ३० वषीर्य छवी राजावत जयपूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या सोडा गावाची सरपंच आहे. साधारणत: गावातील ज्येष्ठांकडे असलेले हे पद भूषवणारी छावी ही भारतातील सर्वात लहान सरपंच आहे. विशेष म्हणजे तिने एमबीएपर्यंतचे शिक्षण घेतले असून, भारती-टेलि व्हेंचर्समधील आपले वरिष्ठ व्यवस्थापकीय पद सोडून ती इथे आली आहे.
दारिद्य हटवून विकास साधण्यासाठी समाज कशाप्रकारे हातभार लावू शकतो, यावरील दोन दिवसीय चर्चासत्रात छवीने आपले विचार मांडले. विकास साधताना ई-सव्हिर्सेस सारख्या नवीन तंत्रज्ञानाची मदत घेण्याची गरज असल्याचे आंतरराष्ट्रीय परिषदेतील प्रतिनिधींशी संवाद साधताना ती म्हणाली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ६५ वर्षांत भारत ज्या गतीने प्रगती करत आहे, ती गती पुरेशी नाही. आपण अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक वेगाने प्रगती साधू शकतो, असेही ती म्हणाली. गेल्या वर्षभरात सोडा गावातील ग्रामस्थांच्या मदतीने खूप काही बदल घडवल्याचेही छवीने सांगितले.
पुढील तीन वर्षांत गावात आमूलाग्र बदल घडविण्याचे तिचे लक्ष्य आहे. आथिर्क मदत न मागता विविध संस्थांना गावात येण्याचे आवाहन तिने केले. संस्था आणि ग्रामस्थ यांच्यातील दरी मिटवण्याचे काम आपण करू, असे आश्वासनही तिने दिले. 'तुम्ही किंवा मी ज्या प्रकारच्या आयुष्याची सहज अपेक्षा करतो, तसे आयुष्य या पिढीला मिळवून देण्याच्या दृष्टीने परिषदेची मदत होईल, अशी मी अपेक्षा करते,' या उद्गारांनी छवीने सभा जिंकली.
( वृत्तसंस्था)


राजस्थानमधील कॉर्पोरेट सरपंच
http://www.esakal.com/esakal/20110402/5291128858982760664.htm
Saturday, April 02, 2011 AT 11:58 AM (IST)
- छवी राजावत
सरंपच म्हणजे डोक्‍यावर फेटा, ठराविक पेहराव आणि फारसा शिक्षित नसलेला अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र, राजस्थानच्या छवीने ही प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न सुरू केले असून, तिला गावकऱ्यांची साथ मिळत आहे, हे विशेष. "स्वदेस' चित्रपटात शाहरुख खान नासाची नोकरी सोडून भारतात येतो. अमेरिकेची हायफाय लाइफ आणि नोकरी सोडून परतणाऱ्या शाहरुख खानच्या चित्रपटातून "या चिमण्यांनो परत फिरा रे' असाच संदेश दिला गेला. असाच काहीसा अनुभव राजस्थानच्या सोडा गावच्या ग्रामस्थांना येत आहे. व्यवस्थापनाची पदवी असूनही कार्पोरेटची नोकरी करण्याऐवजी राजस्थानच्या सोडा गावची सरपंच बनणारी छवी राजावत ही प्रसारमाध्यमे आणि राजस्थानसाठी कौतुकाचा विषय ठरली आहे. छवी राजावत यांचा जन्म राजस्थानचा. राजावत यांनी बंगळूर येथील रिशी व्हॅली स्कूल आणि दिल्लीच्या लेडी श्रीराम येथे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात हुशार असलेल्या छवी यांनी पुण्यात व्यवस्थापनाची पदवी प्रावीण्यासह घेतली. एमबीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी विविध पाच कंपन्यांत काम केले. राजस्थानची कन्या कार्पोरेटच्या "हायटेक' जॉबमध्ये फारशी रमली नाही. कारण तिच्या रक्तात होते राजकारण आणि समाजकारण. कार्पोरेट क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असताना राजावत यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. हा मार्ग नुसता निवडला नाही तर सोडा गावच्या सरपंचदेखील बनल्या. वयाच्या 29 वर्षी सरपंच होणाऱ्या राजावत यांचे आजोबा रघुवीर सिंग यांनी सोडा गावचा कारभार सांभाळला होता. भारतीय खेड्याची ओळख बदलण्यासाठी राजावत यांचे प्रयत्न सुरू असून, सोडा गावाचे संकेतस्थळही विकसित केले आहे. त्यावर 3200 मतदारांच्या गावातील इत्थंभूत माहिती आहेच, त्याचबरोबर गावात राबवण्यात येणाऱ्या योजनांचाही तपशील देण्यात आला आहे. ग्रामीण भागात पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत गावात रोजगाराच्या संधी वाढवणे यावर त्यांचा भर राहिला आहे. याशिवाय जयपूर येथे राजावत कुटुंबीयांचा असलेल्या हॉटेलचा कारभारही छवी पाहतात. तसेच घोडेस्वारीचे प्रशिक्षण देणारी त्यांची स्वतःची शाळा आहे. "ग्रामीण चेहरा बदलला पाहिजे आणि आपण हे करू शकतो,' असा छवी यांना ठाम विश्‍वास आहे. अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या गरिबीसंदर्भातील जागतिक परिषदेत छवी सहभागी झाल्या होत्या. या वेळी त्यांनी गरिबीचा मुकाबला करण्यासाठी "विकासकार्यामध्ये समाजाची असणारी भूमिका' याबद्दल आपले मत मांडले.
- अरविंद रेणापूरकर