Pages

Sunday, October 16, 2011


कलावतीची मुलगी वडिलाच्या मार्गाने -
गरिबीला कंटाळून आत्महत्या
(15-10-2011 : 23:23:07)
देवेंद्र पोल्हे।
दि. १४ (मारेगाव)काँग्रेसचे युवराज खासदार राहुल गांधी यांच्या भेटीने देशात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जळका येथील कलावती बांदूरकर यांच्या विवाहित मुलीने वडीलांचाच मार्ग स्विकारून गरिबीला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून जाळून घेत स्वत:ला संपविल्याची घटना नुकतीच प्रकाशात आली आहे. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. यवतमाळ जिल्हय़ातीलच मारेगाव तालुक्यातील जळका येथील परशुराम बांदूरकर यांनी २00५ मध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर बांदूरकर कुटुंब उघड्यावर पडले होते. अचानक एके दिवशी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी जळका येथे भेट देऊन कलावती बांदूरकर यांची व्यथा समजून घेतली. त्यांच्या गरिबीची कहाणी ऐकून त्यांचे हृदय द्रवले. त्यांच्या कुटुंबासमोर आ वासूनउभ्या असलेल्या समस्यांची राहुलजींनी दखल घेतली. त्यानंतर परत दिल्लीत जाऊन त्यांनी कलावतीची व्यथा संसदेत मांडली. यामुळे कलावतीचे दुख जगासमोर उघड झाले. त्यानंतर सुलभ आंतरराष्ट्रीय संघटनेच्या बिंदेश्‍वर पाठक यांनी पुढील २0 वर्षे कलावतीला दरमहा २५ हजार रुपये घोषणा केली आणि कलावती बांदूरकर रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. आता त्यांना दरमहा २५ हजार रुपये मिळत असल्याने त्यांचे जीवनमान उंचावले आहे. मात्र कलावतीबाईंच्या मुलींच्या दुखाची धग कायमच आहे. कलावती यांना सहा मुली आहेत. मुली विवाहित आहेत. त्यापैकी एक सध्या विधवा आहे. दोन मुलींना परित्येचे जिणे जगावे लागत आहे. त्यापाठोपाठ आता चंद्रपूर जिल्हय़ातील भद्रावती तालुक्यातील राळेगाव येथील सविता दिवाकर खामनकर (२७) या मुलीने जाळून घेऊन आत्महत्या केली आहे. सविता ही कलावती यांची दुसर्‍या क्रमांकाची मुलगी ती. घरातील अठरा विश्‍व दारिद्रय़ व सततच्या आजाराने तिने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत १५ सप्टेंबरला अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले. यात ती ७0 टेच्यावर भाजली. सविताला तत्काळ चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर २६ सप्टेंबरला तिने रुग्णालयातच या जगाचा निरोप घेतला. सविताला पाच वर्षांंची शारू नावाची मुलगी असून ११ महिन्यांचा नमन नावाचा मुलगा आहे. यापूर्वी सविताचा मोठा मुलगा आजारपणात दगावला होता. सविताचा विवाह आठ वर्षांंपूर्वी राळेगाव येथील दिवाकर खामनकर यांच्याशी झाला होता. पतीकडे तीन एकर शेती असून कुटुंबात सासू, सासरे यांच्यासोबत सविता राहात होती. मात्र तीन एकर शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. तिचे सासरे शेतीची वहिती करीत होते, तर पती दिवाकर सालगडी म्हणून नोकरी करीत होता.घरातील दारिद्रय़ामुळे आजारावरील उपचारासाठी पैसे मिळणे कठीण झाले होते. सविता गेल्या एक वर्षापासून सतत आजारी होती. बरा न होणारा आजार व अठराविश्‍व दारिद्रय़ याला कंटाळून अखेर तिने वडील परशुराम बांदूरकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वतला संपविण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्धी माध्यम व पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून सविताने, ‘स्टोव्हवर स्वयंपाक करीत असताना पदराने पेट घेतल्याने जळाल्याचेपोलिसांना बयाण दिले, असे कलावती यांनी सांगितले. वास्तविक सविताकडे स्टोव्हसुद्धा नाही. आता सविताचा ११ महिन्यांचा नमन व पाच वर्षांंची शारू पोरकी झाली आहे. नमनला कलावतीबाइंनी जळका येथे आणले आहे.

Saturday, October 8, 2011

भारतीय सैन्यातील पहिली रणरागिणी
सैन्यदल मुख्य करुन पुरुषांचे क्षेत्र मानले जाते. पण, याला छेद दिला आहे तो दोन मुलांची आई असलेल्या शांती टिग्गा यांनी.महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असताना लढाईच्या मैदानाचा मात्र त्याला अपवाद होता. मात्र, महिलासुद्धा या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहू शकतात, हे भारतीय सैन्यात दाखल झालेल्या या पहिल्या महिलेने दाखवून दिले आहे. सैन्यात भरती होण्यासाठी घेण्यात आलेल्या शारीरिक क्षमता चाचणीत पुरुष सहकार्यांपेक्षा अधिक सक्षम कामगिरी करत ३५ वर्षीय सप्पर शांती टिग्गा प्रादेशिक सेनेच्या (टेरिटोरियल ९६९ रेल्वे अभियंता रेजिमेंटमध्ये दाखल झाल्या. दीड किलोमीटरचे अंतर धावताना टिग्गा यांना पुरुष उमेदवारांपेक्षा पाच सेकंद कमीच लागले. शिवाय, ५० मीटर धाव त्यांनी केवळ १२ सेकंदांत पूर्ण केली. शारीरिक चाचणीतील त्यांची ही कामगिरी उत्कृष्ट असल्याने त्यांना सैन्यात जवान म्हणून प्रवेश देण्यात आला.
महिलांना लढाऊ नसलेल्या अधिकारी श्रेणीतच सैन्य दलामध्ये दाखल होता येते. पण, शांती टिग्गा यांनी १३ लाख सैनिकांच्या दलामध्ये पहिली महिला जवान म्हणून प्रवेश मिळविला आहे.
पतीचा मृत्यू झाल्यानंतर २००५ मध्ये अनुकंपा तत्त्वावर शांती टिग्गा यांनी पश्चिम बंगालच्या जलपायगुडी जिल्ह्यातील चालसा स्थानकामध्ये पॉइंट्समन म्हणून काम केले होते. गेल्या वर्षी त्यांना रेल्वेच्या प्रादेशिक सेनेसाठी स्वयंसेवक हवे असल्याची माहिती मिळाली आणि तिथे त्या दाखल झाल्या. तोपर्यंत त्यांना कल्पनादेखील नव्हती की, यापूर्वी कोणत्याच महिलेने भारतीय सैन्यात अधिकारी पदाखालील पदावर काम केलेले नाही. भरती प्रशिक्षण शिबिरादरम्यान सहजतेने बंदूक हाताळण्याच्या आपल्या कौशल्याने टिग्गा यांनी प्रशिक्षकांची वाहवा मिळविली. शिबिरादरम्यानच्या एकूण कामगिरीवरुन टिग्गा यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशस्ती देण्यात आली. शांती टिग्गा यांना प्रादेशिक सेनेत ‘सॅपर’ म्हणून सामील करुन घेण्यात आले आणि त्यांनी रेल्वे अभियांत्रिकी तुकडीबरोबर काम सुरू केले. युद्धमोहिमांदरम्यान अभियांत्रिकी कामे करणार्या तुकडीतील जवानांना सॅपर असे म्हणतात. युद्धासाठी आवश्यक पूल बांधणे, भुसुरूंग पेरणे किंवा नष्ट करणे, रस्ते-हवाई तळ उभारणी अशी त्यांची प्रमुख कामे असतात. मात्र, प्रत्यक्ष लढाईतही त्यांचा सहभाग असतो.
शांती यांना लहानपणापासून सैन्यात जाण्याची आवड. जवानांचा लष्करी हिरवा गणवेश आपण परिधान करावा असे त्यांना वाटायचे. काही नातेवाईक लष्करात असल्याने ही आवड अधिकच वाढली. यामुळे शारीरिक चाचणीत मागे पडू नये यासाठी शांती यांनी खूप सराव केला आणि भरपूर मेहनत घेतली. त्यांची मेहनत फळास आली आणि त्या भारतातील पहिल्या रणरागिणी ठरल्या आहेत. तसे पाहिले तर भारताला राणी चेन्नमा, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, झलकारी या महिला योध्दांचा इतिहास आहे. या महिलांचे कर्तृत्व संपूर्ण जगाला माहीत आहे.
भारतीय सेनादलात महिलांना प्रथम वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आला. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून सेनादलात १९६८ साली दाखल झालेल्या पुनीता अरोरा या लेफ्टनंट जनरल आणि नौदलाच्या व्हाइस ऍडमिरल या मानाच्या पदापर्यंत पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. भारतीय वायुदलातही महिला वैमानिक दाखल झाल्या खर्या; पण असे असले तरी महिलांचा समावेश हा अधिकारी पदापर्यंतच मर्यादित राहिला होता. थेट रणांगणावर महिलांची नियुक्ती भारतात आजवर झाली नव्हती. जगात केवळ इस्त्रायल, कॅनडा आणि न्यूझीलंड या तीन देशांतच महिलांची सेनादलात थेट रणांगणावर नियुक्त करण्यात येते. आता मात्र भारतीय सैन्यात थेट रणांगणापर्यंत प्रवेश मिळविण्यात शांती टिग्गा यशस्वी झाल्या आहेत. यामुळे शांती टिग्गा यांनी एक प्रकारे रणांगणावरील पुरुषी मक्तेदारीला आव्हानच दिले आहे, असे म्हणता येईल.
- धर्मेंद्र सामुद्रे

स्त्री हक्कांच्या संघर्षासाठी

 शांततेचा नोबेल

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image
महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणा-या एलेना जॉन्सन सरलीफ,लेमा बोवी आणि तवक्कुल कर्मण या तिघींना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

ओस्लो- महिलांच्या हक्कांसाठी अवरित कार्य करणा-या एलेना जॉन्सन सरलीफ,लेमा बोवी व तवक्कुल कर्मण या तीन महिलांना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून  जाहीर झाला.
"जोपर्यंत स्त्रियांना  पुरुषांप्रमाणेच हक्क व संधी मिळत नाहीत, तोपर्यंत या समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही" असे पुरस्कार समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे.
महिलांच्या हक्क आणि सुरक्षिततेसाठी अहिंसक चळवळीने लढा उभारुन शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल या तिघींचा गौरव केल्याचे शांतता नोबेल पुरस्कार देणा-या समितीने सांगितले.
एलेना सरलीफ या लायबेरीयाच्या राष्ट्रपती आहेत, लेमा बोवी याही लायबेरीयाच्याच नागरिक असून शांतता प्रस्थापनेसाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. पुरस्कारातील तिस-या भागीदार तवक्कुल कर्मण या येमेनच्या नागरिक आहेत.
सरलीफ (72) यांनी हॉर्वर्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले आहे. आफ्रिका खंडातील त्या  पहिल्या महिला लोकनियुक्त राष्ट्रपती असून 2005 मध्ये त्यांची निवड करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लायबेरीयात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्वपूर्ण काम केले.सरलीफ यांना पुलित्झर पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
लेमॅह बोवी यांनी लायबेरिया मधील  ख्रिश्चन आणि मुस्लीम महिलांना एकत्र आणून त्यांना आपल्या हक्कांविषयी जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या तिस-या महिला तवाक्कूल करमान या पेशाने पत्रकार आहेत. येमेन मधील विखुरलेल्या महिला पत्रकारांच्या संघटीत करून त्यांना मानवी हक्क मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  करमान या राजकारणातही सक्रीय असून त्यांनी येमनचे अध्यक्ष अब्दुल्ला सलेह यांना पदच्युत करण्यासाठी झालेल्या संघर्षामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.

Wednesday, October 5, 2011

महिला सबलीकरण रखडते कुठे?Source: divya marathi Last Updated 01:35(10/06/11)
आर्टिकल Share


महिला सबलीकरणाचे राष्टÑीय धोरण २००१ मध्ये मंजूर करण्यात आले. त्यानुसार केंद्र सरकारच्या तर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. तरीही महिलांचा विकास होताना दिसत नाही. स्त्रीचं सबलीकरण होणं म्हणजे नक्की काय याची एकदा व्याख्या होणे गरजेचे आहे.
स्त्रियांंचा सन्मान, रोजगार, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्न १९७५ नंतर ऐरणीवर आले. या सर्व प्रश्नांची चर्चा सार्वजनिक व्यासपीठावर करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. स्त्री चळवळीत शोषणमुक्तीचा आदर्शवादही वारंवार मांडला गेला. त्या आंदोलनात अनेक विचारसरणीच्या प्रवक्त्या, कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आपले विचार मांडले. स्त्रीमुक्तीची सामूहिक संघर्षाची परिभाषा सोडून सबलीकरणाच्या परिभाषेला मान्यता दिली. १९८० च्या दशकातील मध्यात उदारीकरणाच्या धोरणामुळे सबलीकरणाची परिभाषा समोर आली. त्यानंतर महिला सबलीकरणाची संकल्पना रूढ झाली. भारत सरकारने २००१ हे वर्ष महिला सबलीकरणाचे वर्ष म्हणून घोषित केले. स्त्रियांच्या सबलीकरणासाठी राष्टÑीय धोरण ‘द नॅशनल पॉलिसी फॉर द एम्पावरमेंट आॅफ विमेन’ हे २००१ मध्ये मंजूर करण्यात आले. महिलांचे सबलीकरण म्हणजे स्त्रियांचे आध्यात्मिक, सामाजिक, राजनैतिक, आर्थिक सामर्थ्य वाढविणे. त्यामध्ये त्यांच्या स्वत:च्या क्षमतेसंबंधी त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हा आहे. महिला सबलीकरणात विविध पैलूंचा विचार केला जातो. मूलभूत हक्क आणि याचे रक्षण करण्यासाठी संघर्षाची क्षमता हा स्त्रीमुक्तीचा आशय सबलीकरणाची चर्चा करताना कुठेही दिसत नाही. भारतात स्त्री-पुरुष समानतावाद १९७० च्या दशकानंतर सक्रिय झाला. १९९० च्या दशकात परदेशी संस्थांकडून मिळालेल्या अनुदानामुळे स्त्रियांसाठीच्या नवीन एनजीओची स्थापना करण्यास मदत मिळाली. भारतात ‘स्वयंसहाय्य गट आणि सेल्फ एम्प्लॉयड विमेन्स असोसिएशन’सारख्या स्वयंसेवी संघटनांनी स्त्रियांच्या हक्काबाबत महत्त्वाची भूमिका वाढविली. तसेच अनेक महिला स्थानिक आंदोलनात नेत्यांच्या स्वरूपात पुढे आल्या आहेत. भारतातील स्त्रिया आता शिक्षण, राजकारण, प्रसारमाध्यमे, कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे महिलांचे सबलीकरण व्हावे यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवित आहे. महिलांचा सत्तेत सहभाग म्हणजेच महिलांचे सबलीकरण ही धारणा आता मागासलेल्या देशात वाढत चालली आहे. युरोपातील पुढारलेल्या देशात महिलांना राजकारणात पूर्वी फारसे स्थान नव्हते. युरोपातील महिला इतर क्षेत्रात पुढे गेल्या आहेत, परंतु राजकारणात आजही मागे आहेत. भारतीय राजकारणात महिलांना पदे मिळाली की महिला पुढारल्या, असे होत नाही. राजकारण वगळता इतरही क्षेत्रात महिला पुढे गेल्या आहेत. लोकांची मागणी वाढली की राज्यकर्ते लोकप्रिय निर्णय घेतात. शिक्षण, नोक-या आणि राजकीय पदापर्यंत राखीव हा परवलीचा शब्द आहे. महिलांना राजकारणातील ३३ टक्के पदे देऊन सबलीकरण होणार नसून कुटुंबातूनच महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रोत्साहन व संधी उपलब्ध होतील, अशी व्यवस्था आणि मानसिकता निर्माण होणे गरजेचे आहे.