नवरात्र : कृषीमायेचा उत्सव
आश्विन मासारंभापासून देशात नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. आपल्या राज्यात हा उत्सव घटस्थापनेचा उत्सव व कृषीमायेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. जगभरात शेतीचा शोध स्त्रियांनी लावल्याची एक आठवण या उत्सवामागील मूळ प्रेरणा आहे. त्यामुळे राज्यातच नाही तर देशातील कानाकोपºयात हा उत्सव केवळ स्त्रिया साजरा करत असतात. अलीकडे या उत्सवाचे चित्रच बदलून गेले आहे. घट स्थापनेपेक्षा या उत्सवात अनेक नवे फॅड आल्यामुळे मूळ उत्सव आणि त्याचे गांभीर्य लोपत चालल्याचे दिसते. कृषीमायेची आराधना करणारी आणि तिचे स्तवन करणारी परंपरा घटस्थापनेच्या प्रतिकांमध्ये थोडीशी शिल्लक होती. ती सध्याच्या नवनवीन फॅडमुळे ती भविष्यात पूर्णपणे लोप पावण्याची भीती वाटते.
देशात हा उत्सव साजरा करण्यासाठी विविध परंपरा असल्या तरी सवार्चा मूळ उद्देश कृषीमायेचे गुणगाण करणे, तिचे स्तवन करुन शेतीच्या शोधाची आठवण करणे असाच आहे. आपल्या राज्यात याला घट स्थापना म्हणून ओळखतो. नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यात सर्वच जाती-जमातींच्या महिला या काळात नऊ दिवस आपापल्या घरातील देवळी किंवा माजघरात घट बसवितात. यात शेताच्या शेजारी असलेल्या वारुळाची, नदीच्या कडेची, अथवा शेताच्या बांध्यावरची माती आणून त्यात विविध प्रकारचे धान्य पेरले जाते. या धान्याशेजारी तांब्याच्या घट बसून रोज वेगवेगळी फुले, आणि विशेषत: कवड्यांची माळ व दिवा लावून त्याची पूजा केली जाते. परडी (तांदूळ, दाळ, पीठ, मिरची, कांदे, डाळ, तेल आदी ठेवलेली एक टोपली) आणि कवड्यांच्या माळेला त्यात खूप महत्व असते.
घटाची सर्व पूजा स्त्रियांकडूनच केली जाते. गळ्यात कवड्यांची माळ आणि हातात परडी घेऊन प्रत्येक स्त्री किमान पाच घर तरी जोगवा मागतात. त्यानंतरच घरातील घटाची पुजा सुरू होते. पुरूष मंडळीचा त्यात काहीही सहभाग नसतो. भंडाºयााने कपाळ माखलेला आणि गळ्यात कवड्यांची माळ असलेला देवीचा भगत किंवा आराध्यांकडून रात्रीला गायन आणि नृत्याचे कार्यक्रम साजरे केले जातात. गुजरातमधील गरबा हा एक त्याचाच प्रकार आहे, परंतु अलीकडे त्याचे बाजारीकरण झाले आहे. मात्र, तरीही गुजरातमधील आदिवासी भागातील महिला अजूनही कृषीमायेचे ऋण गाणारे गीत गातात.
पश्चिम महाराष्ट्रात दसºयाच्या दिवशी गावागावातील धनगर समाजातील लोक पालखी काढतात. त्यात देवीच्या स्तवन किंवा परसू बाळाचे नऊ खंडकरी, खंडोबा, विरोबा, मल्हारी, म्हसोबा आदींच्या लग्नांच्या, पराक्रमांच्या कथा सांगून भंडार उधळत बेभानपणे नाचले जात.
या काळात आदिवासी आणि दलित स्त्रिया रात्रीला देवीच्याच पूजेचा एक भाग म्हणून चौपटाचा खेळ खेळतात. चौपटाच्या खेळात घरातील सर्वात ज्येष्ठ महिलांकडून या खेळाची सुरूवात करण्याची प्रथा आहे. आदिवासी भागात या काळात हा खेळ अजूनही खेळला जातो. चौपट हे स्त्रिसत्ताक राज्यांमध्ये धान्याच्या समान वाटपाचे प्रतिक असते.
भूमातेतून उदरातून हळूहळू उगवणाºया धान्याची पूजा ही भूमातची, देवीची पुजा म्हणून केली जाते. हा उत्सव कृषिमायेचा उत्सव असल्याने कृषी आणि देवीशी संबंधित गाणे गाऊन तो साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी हे उगवलेले धान शेतात नेऊन टाकतात. यामुळे शेतीची भरभराट होते. आणि पिक मोठया प्रमाणात येतात अशी धारणा आहे. काही जमाती शेतासोबतच ते नदीच्या पात्रातही सोडतात. नऊ दिवसानंतर ग्रामीण भागात अजूनही हे चित्र पहावयास मिळते.
शेतीचा शोध स्त्रियांनी लावला
जगभरात शेतीचा शोध स्त्रियांनी लावला हे भारतीयच नाही तर जगभरातील पुराणशास्त्रांमध्ये मान्य करतात. शेतीच्या शोधात पुरूषांचे कोणत्याही प्रकारचे योगदान नव्हते. शरद् पाटील म्हणतात, ‘स्फ्य नावाच्या कठीण टोक असलेल्या काठीने जमिनीत पेरणी, निंदणी व कापणीची सर्व कामे करत. पुरूष मागासलेल्या हत्यांनी व आगीने जमिनीचा तुकडा साफ करत. भरघोस हंगामाचे फळ मिळविण्यासाठी वैदिक कृषि-मायेचा विधी म्हणून सीता-यज्ञ केले जात होते. ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षापर्यंत हे यज्ञ केवळ स्त्रिया करत होत्या. तो स्त्रियांचाच सण होता. वैदिक कृषिदेवता सीता इचे स्तवन केल्यानंतरच पेरणीला प्रारंभ केला पाहिजे असे आदशे कौटिल्य (२.४०) देत असल्याचे दाखले प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांनी दिले आहेत.
शरद् पाटील म्हणतात, 'शेतीचा मायाविधी असलेल्या तंत्रात कुलचा अर्थ स्त्री असा होतो. अथर्ववेदाची एक ऋचा सांगते की, स्त्री ही कुलाची मुख्य होती. ती कुलाची पुरोहिता या नात्याने कुल जमिनीची सुपीकता व उत्पादकता संवर्धित करण्यासाठी कृषिमायेचा विधी करी. शक्ती वा मातृदेवतेचे भक्त असलेल्या शाक्तांना त्यांचे धर्मग्रंथ कुलवृक्ष व कुलयोगिनींची पुजा करायची आदेश देतात. अंथरुणातून उठल्याबरोबर शाक्तांनी पार पाडायचा अगदी पहिला विधी म्हणजे कुलवृक्षांना ‘ओम कुलवृक्षेभो नम:’ या मंत्राने वंदन करणे.'
देशात आणि राज्यातही मातृदेवताची देवळे ही अवैदिक, तंत्राशी वारसा सांगणारी आहेत. तुळजापूरची मूळ मातंगी आणि भवानी, माहुरची रेणुका, काळुआई, सप्तशृंगी, बारडची पोचीमाय, येरमाळ्यातील येडामाय, चंद्रपूरची महाकाली आदी सगळ्याच मातृदेवता या आकारहीन दगडाच्या आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात कोणत्याही गावात त्यांची गावाची रक्षणकर्ती म्हणून अशा आकारहीन मरीआई, पोचिम्माची देवळे असतात. त्याशिवाय प्रत्येकांची एक कुलदेवीही अशाच आकारहीन दगडाने आणि शेंदूर माखलेली माजघरात किंवा घराच्या शेजारील देवळीत बसवलेल्या असतात.
आकारहीन दगडातील देवता
शरद् पाटील म्हणतात, 'निर्ऋती ही जल किंवा नदीदेवता होती. अप्सरेचे मराठी रूप आहे आसरा नदीतील विशिष्ट दगड वा खडकांना आसरा म्हणून ओळखले जाते. तेथे बाळांतीण बाया अजूनही तान्ह्या मुलांना घेऊन जातात आणि त्याला झोळीत घालून झोके द्यायची नक्कल करतात.' प्राचीन काळापासून मातृदेवतांकडे मुलांसाठी ओटी (झोळी) असते. यामुळे रेणुका, मातंगी, मांगम्मा (तिरुपती), धुरपता, महाकाली, आदी देवींची पूजा तिच्या ओटीत खण नारळ टाकल्याशिवाय केली जात नाही. चंद्रपूरच्या धुरपतामायपासून ते हरितीपर्यंतच्या मातृदेवतांच्या बाबतीत आपली मुले देवीच्या झोळीत टाकून त्यांचे रक्षण करण्याची मागणी महिला करताना दिसतात.
देवीचे पुजारी बारा बलुतेदार
आपल्या राज्यात अजूनही ब-याच ठिकाणी मातृदेवींची पूजा करण्याचा मान देवकरीण, पोतराज, आराधी, महायोगिनी, गुरव, मांगीण पुजारी यांनाच आहे. मातृदेवतांचा संबंध शैवांशी, शाक्तांशी आणि तंत्राशी संबंधित असल्याने त्यांची पूजा यांच्याकडून केली जात होती. हे सर्व शिवाचे उपासक होते. कालांतराने अनेक देवींच्या अख्यायिका विकृत स्वरूपात करण्यात आल्यामुळे त्यांचे मूळ गांभीर्य खूप कमी अंशात शिल्लक आहे. शैवांशी संबंधित असलेल्या देवींकडून असूराची हत्या करण्याच्या कथा त्यातून निर्माण झालेली महिशासूरमर्दिनी आदी रूपे याचाच एक भाग आहेत.
त्यांनाच तो मान होता. महाराष्ट्रात सात मातांची सात देवळे आहेत. सर्वात मोठी बहीण सप्तशृंगीचे देऊळ नाशिक जिल्ह्यात आहे चैत्री पौर्णिमेला तिची भरणारी यात्रा सर्वात मोठी असते. सगळ्यात धाकटी बहिण एकविरा (एक वीर असलेली ) हिचे एक देऊळ धुळ्याला स्मशानभूमीशेजारी आणि दुसरे लोणावळा जवळ कार्ला लेणीच्या प्रवेशद्वारावरआहे.या दोन्हीची पुजा गुरव जातीचे भोपे करतात. ठाणे जिल्ह्यातील महालक्ष्मी या आदिवासी देवीचे वंशपरंपरा पुजारीपण खुद्द आदिवासी वारल्यांचेच कुटुंब करत आहे.
चंद्रपूरची धुरपता (महाकाली)चीही पूजा मांगीण जातीची देवकरीण आणि पोतराज करतो. तर तुळजाभवानीचा पुजारी कुणबी, मराठा आहे. शिवकाळार्पयत आपल्या राज्यात योगींनींचे आणि शाक्त पिठांचे केंद्र हे बहिष्कृत वस्त्यांतून चालत होते, याचे दाखले शरद् पाटील यांनी दिले आहेत.
संजीव भागवत,
मुंबई
4 comments:
khup sunder
khup sunder
अप्रतिम
छान
Post a Comment