Pages

Monday, September 24, 2012

महिलांच्या सशक्तीकरणाशिवाय 
सर्वोत्कृष्ट देशाची कल्पना अशक्य !
 
दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. म्हणजेच समाजाने महिलांसाठी सर्मपित केलेला एक दिवस. या दिवशी महिलांचा विकास, त्यांचे सशक्तीकरण या विषयांवर अनेक चर्चा होतात, त्यांच्या विकासासाठी मोठया-मोठया घोषणा होत असतात. परंतु या सगळया प्रयत्नांनंतरही महिलांच्या परिस्थिती मध्ये सुधारणा होत नाही. यासाठी महिलांनीच त्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्तरावर सशक्तीकरण कसे होईल ते पाहिले पाहिजे.       
आपल्या कुंभार समाजातील महिला वर्षानुवर्ष घरच्या कुंभार उद्योगात सहकारी म्हणुन काम करीत आहेत. ही अभिमानाची बाब आहे की, त्यांच्या सहकार्यामुळेच अनेक वर्ष कुंभार कारागीर आपला व्यवसाय करीत आहेत.सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबात घरातील स्त्रीच कुटुंबाचा गाडा हाकत असते. मुला-बाळांचे संगोपन, वृध्द मंडळींची देखभाल, घरातील कर्त्या पुरूषांच्यामागे (पती) खंबीरपणे उभे राहणे व महत्वाच्या बाबीत निर्णय घेणे. ही कामे प्रामुख्याने स्त्रीयांनाच करावी लागतात. तरी देखील तिच्या कार्याला नगण्य समजले जाते. म्हणुन आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या महिलांना स्वतः सजग राहण्याची गरज आहे. जितक्या मोठया संख्येने महिला आत्मनिर्भर होतील, रोजगार किंवा नोकरी करतील तितक्याच त्या शक्तीशाली होतील. या दिशेने आपण जे पाऊल टाकले आहे, त्यात प्रामुख्याने "महिला बचत गट' हा मुख्य मार्ग समोर आहे. ज्यामुळे महिलांना रोजगार व सन्मान मिळण्यास पर्यायाने त्यांचे सशक्तीकरण होण्यास निश्चितच मदत मिळेल.

Thursday, September 20, 2012


अगतिक स्त्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न  

जयमती दळवी , 

सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आपल्या स्वरूपसुंदर शरीराचा शेवट करून घेणाऱ्या नजमाची बातमी वाचली. विविध वर्तमानपत्रांतून या घटनेवर आलेले लेख वाचले आणि मन विषण्ण झाले. ही घटना खरी तर १९७७ सालची; पण आजही ती विषण्णता कमी न होता त्यात भरच पडते आहे. अशा अनेक नजमांचा शेवट थोडय़ाफार फरकाने असाच होत आलेला आहे.. होतो आहे.. आणि असाच पुढेही होत राहणार का? देहविक्रयाच्या नरकातून त्यांची कधीच सुटका होणार नाही का? त्यांना नरकात ढकलणारे दोषी की नरकात पडणाऱ्या त्या स्वत:च दोषी, हे आपण सोफ्यावर बसून आरामात बातम्या वाचणाऱ्या वाचकांनी का ठरवावे? हक्क तरी आहे का आपला? ‘वेश्या’ हा शब्दही तोंडातून काढणे म्हणजे तोंड विटाळून घेणे असे आपल्यातले काही महाभाग समजतात. ‘त्या तसल्या बायका’ असा त्यांचा (कधी केलाच तर) तिरस्कारयुक्त उल्लेख ते करतात. इतकी त्यांना या व्यवसायाबद्दल घृणा वाटते. त्याला व्यवसाय म्हणावे का, हीसुद्धा एक शंका! पण मालाच्या विक्रीबद्दल पैसे घेऊन उदरभरणासाठी केलेला तोही एक व्यवसायच!

मातृत्वाचं मोल 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो

तिच्या श्रद्धेच्या सत्त्वपरीक्षेचा क्षण होता तो. तो तडफडत होता, विव्हळत होता. पाण्याच्या थेंबासाठी आसुसला होता. तिच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं. अखेरच्या घटका मोजणाऱ्या आपल्या तृषार्त पुत्राला ती थेंबभर पाणीही देऊ शकत नव्हती. किती क्रूर असते नियती. उरात दूध आणि डोळ्यांत अश्रू...हेच मातृत्वाचं फलित असतं, हे तिला जाणवलं! या जगाचा निरोप घेताना, त्यानं तिला विश्‍वाची माता केलं. ज्यांना आईच्या मांडीचं कधी सुख मिळालं नाही, त्यांना त्यानं माउलीच्या पदरात टाकलं! 
--------


मरिया 15-16 वर्षांची एक किशोरी. तरी ध्यानाच्या कलेत पारंगत. ती ध्यानमग्न असताना तिला दैवी साक्षात्कार झाला. देवाचा दूत तिच्या पुढ्यात उभा राहिला. त्या दैवी दर्शनानं ती शहारली. तो तिला म्हणाला, ""हे कृपापूर्ण स्त्रिये, कल्याण असो. प्रभू तुझ्याबरोबर असो.'' या जगावेगळ्या अभिवादनानं ती गोंधळात पडली. तिला आधार देत देवदूत म्हणाला, ""मरिये, भिऊ नकोस. तुझ्यावर देवाचा कृपाप्रसाद झाला आहे. तू गर्भवती होशील...तुला पुत्र होईल...'' 
""मी तर कुमारिका आहे. माझं लग्न ठरलं आहे; परंतु झालेलं नाही...हे कसं शक्‍य आहे?'' 
मरियेनं नम्रतेनं विचारलं, ""त्याची चिंता तू करू नकोस. तुला देवाचा अनुग्रह होऊन तुझ्या उदरी देवपुत्र जन्म घेईल...देवाला काहीच अशक्‍य नाही... 

""जशी देवाची इच्छा..'' मरिया उद्गारली. 
""तथास्तु'' असं बोलून देवदूत अंतर्धान पावला. 
मरिया ध्यानातून बाहेर आली...कौमार्यावस्थेत बाळाची चाहूल लागणं समाजाला बिलकूल मान्य नव्हतं. अशा स्त्रीसाठी धर्म-कायद्यानं धोंडमाराची शिक्षा निश्‍चित केली होती. 
।। जिजाऊसाहेब ।।

इंद्रजित सावंत
Sunday, May 13, 2012 AT 03:15 AM (IST)

माता असावी तर जिजाऊसाहेबांसारखी, असं सार्थ अभिमानानं म्हटलं जातं. मोठ्या जिद्दीनं जिजामातेनं पुत्र शिवबाची जडणघडण केली... पुढं शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामागं खरी प्रेरणा होती ती जिजाऊसाहेबांचीच... 

"जिजिआऊ वालिदा-द-राजा शिवाजी' म्हणजे राजा शिवाजींची माता "जिजाऊ' ही राजमाता जिजाऊसाहेबांची मुद्रा आहे. जिजाऊसाहेबांच्या सदरेवरून सुटणाऱ्या आज्ञापत्रांच्या माथ्यावर दिमाखात ही मुद्रा उमटवली जात असे. होय स्वतंत्र मुद्रा! तीही एका स्त्रीची! हे शिवकाळात एक आश्‍चर्यच होतं. ज्या काळात स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते, त्या काळात शिवाजीराजांची ही माता आपली मुद्रा वापरत होती. एवढंच नव्हे तर, राजसदरेवर बसून न्यायनिवाडेही करीत असे. जिजाऊसाहेबांनी दिलेली न्यायनिवाड्याची काही पत्रंही आज उपलब्ध आहेत त्यावर उमटवलेल्या त्यांच्या मुद्रेसह. जिजाऊंनी दिलेला निर्णय पुत्र शिवबा तर मानत असेच; शिवाय सर्व गोतसभाही एकमुखानं हा जिजाऊंचा निर्णय मानत असे. 

हे तर महिला दुर्बलीकरणच!

अंतरा देव सेन

सरकारने आणखी एक चूक केली आहे. त्याने एक विचित्र वाटणारा प्रस्ताव मांडला आहे. आता हाऊसवाईफ या नात्याने घरातील कामे करणार्‍या पत्नीला त्या कामासाठी वेतन देण्याची पाळी त्यांच्या पतीराजांवर येणार आहे.'पण हे काही वेतन म्हणता येणार नाही', असा खुलासा महिला व बालकल्याण मंत्री कृष्णा तीरथ यांनी केला आहे.'तुम्ही त्याला वेतन म्हणू नका. त्याची संभावना मानधन किंवा अन्यप्रकारे करता येईल.' पण या खुलाशावरून मंत्रिमहोदयांची अस्वस्थता उघड झाली आहे. स्त्री ही गृहलक्ष्मी असते. ती तिच्या पतीची हृदयस्वामिनी असते. तिच्या मुलांसाठी ती सुपरवूमन जशी असते, तसेच सुख देणारी परीसुद्धा असते. ती तिच्या सासूच्या आ™ोत राहणारी कर्तव्यदक्ष सून असते. तसेच घरात आणि बाहेरसुद्धा स्वत:चा वचक निर्माण करणारी मेमसाबदेखील असते. तिला सरकार आता घरेलू कामगाराचे रूप देणार आहे का? ती निव्वळ वेतन घेऊन काम करणारी कर्मचारी ठरणार आहे का?

Friday, September 14, 2012

नव-याच्या पगारातील वाटा गृहिणींना


image 
फक्त घर सांभाळणा-या गृहिणींना त्यांच्या नव-याच्या पगारातील काही टक्के हिस्सा मिळणार आहे.


नवी दिल्ली -  गृहिणींसाठी एक खुशखबर...फक्त चूल आणि मूल सांभाळणा-या प्रत्येक गृहिणीला तिच्या नव-याच्या प्रत्येक महिन्याच्या पगारातील काही टक्के रक्कम त्यांच्या खात्यातही जमा होणार आहे. सरकार या प्रस्तावावर विचार करत आहे.
आम्ही याबाबत एक सर्वे केला आहे. गृहिणींना काय करतेस’  असा प्रश्न विचारल्यास त्यांचं उत्तर काहीच नाही असं असते. त्यामुळे त्यांचा कुटुंबातील महत्वाचा सहभाग लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे असं महिला आणि बालकल्याण मंत्री कृष्णा तिरथ यांनी सांगितले.

Wednesday, September 12, 2012

परिवर्तनावर विश्वास असलेली ‘लक्ष्मी


परिवर्तनावर विश्वास असलेली ‘लक्ष्मी

किरण मोघे | Jul 25, 2012, 02:42AM IST

 

23 जुलै रोजी सकाळीच दूरचित्रवाणीवर कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या दु:खद निधनाची बातमी बघताना मन खिन्न झाले. जनवादी महिला संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची एक कार्यकर्ती या नात्याने त्यांच्या सहवासात घालवलेल्या अनेक क्षणांच्या आठवणी उजळून आल्या. 
हस्तांदोलनाच्या त्यांच्या कोमल स्पर्शातून, प्रेमळ आवाजातून त्या आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना आपलेसे करून घेत; पण कोणत्याही प्रकारच्या अन्याय-अत्याचाराला मात्र अतिशय कणखरपणे प्रखर विरोध करत असत. 2010मध्ये कानपूर येथे संघटनेचे 10वे राष्ट्रीय अधिवेशन झाले तेव्हा आपल्या उद्घाटनाच्या संदेशात सर्व प्रतिनिधींना ‘रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अन्यायाविरुद्ध लढत राहा’, असे आवाहन त्यांनी केले, तेव्हा सभागृहात प्रचंड स्फूर्तिदायक आणि रोमांचकारी झालेले वातावरण अजूनही मला आठवते. 
कॅप्टन लक्ष्मी यांचा जन्म मद्रास (चेन्नई) येथे 24 ऑक्टोबर 1914 रोजी झाला. त्यांचे वडील एस. स्वामीनाथन हे मद्रास उच्च न्यायालयाचे प्रख्यात वकील होते, तर त्यांची आई अम्मूकुट्टी या महिलांच्या हक्कांसाठी लढणा-या समाजसेविका आणि स्वातंत्र्यसेनानी होत्या. अशा आर्थिक-सामाजिकदृष्ट्या संपन्न कुटुंबात स्वातंत्र्य आंदोलनाचे बाळकडू त्यांना मिळाले. तरुण वयातच लक्ष्मी स्वामीनाथनने उत्साहाने ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधी राष्ट्र ीय चळवळीत उडी घेतली. परकीय वस्तूंची होळी करताना स्वत:चे महाग कपडे व खेळणी जाळताना त्यांना अजिबात वाईट वाटले नाही.